मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच भाग म्हणून त्यांनी आता CWC च्या ऐवजी दुसरी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये 47 सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. या यादीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग, एके अँटनी या नावांना स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान काँग्रेसमधील प्रत्येक मोठा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीमार्फत (CWC) घेतला जातो. त्या कार्यकारिणीत एकूण 23 सदस्य आहेत. पण आता मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसची आधीची कार्यकारिणी (CWC) रद्द करत त्या जागी त्यांनी नवीन समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये 47 सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. आता ही समिती अनेक मोठे निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या कायदेशीर घटनेला डोळ्यासमोर ठेवून ही नवीन समिती स्थापन केली आहे. काँग्रेसकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, ही सुकाणू समिती काँग्रेसच्या कलम XV (b) अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे, जी आता काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) च्या जागी काम करेल.
खरगे यांनी आपल्या नव्या समितीमध्य़े अनेक मोठ्या चेहऱ्यांना स्थान दिले आहे. अभिषेक मनु सिंघवी, आनंद शर्मा, रणदीप सुरजेवाला, अजय माकन, दिग्विजय सिंग, अंबिका सोनी, हरीश रावत, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, मीरा कुमार, पीएल पुनिया, प्रमोद तिवारी, सलमान खुर्शीद, राजीव शुक्ला यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र या समितीत शशी थरूर यांचा समावेश का करण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती, मात्र त्यांचा समावेश होणार की नाही, याबाबत वेगवेगळी मतप्रवाह होती.
दरम्यान अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी शशी थरूर यांचा चांगल्या फरकाने पराभव केला. त्या निवडणुकीत खरगे यांना एका बाजूला 7897 मते मिळाली, तर शशी थरूर यांना 1072 मतांवर समाधान मानावे लागले. मोठी गोष्ट म्हणजे त्या विजयाने काँग्रेसला 24 वर्षांनी बिगर गांधी अध्यक्ष मिळाला.