भाजपला चोर म्हणावं की डाकू?, आमची ६ सरकारं पाडली; मल्लिकार्जुन खर्गेंचा आरोप

यंदांच्या वर्षात ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. काल त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड अशी तीन ईशान्येकडील राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून भारत जोडो यात्रा सध्या पठाणकोटला पोहोचली आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपला चोर म्हणत त्यांनी आमची ६ सरकारं पाडल्याचा आरोप केला आहे.

भारत जोडो यात्रेतून मल्लिकार्जुन खर्गे यांनी संबोधित करताना म्हटले की, भाजप सरकारने आमच्या पक्षातील अनेक लोकांना धमकावून पळवून नेले. तसेच त्यांनी देशभरातील आमची ६ सरकारं पाडली आणि स्वत:ची उभी केली. त्यामुळे भाजपला चोर म्हणावं की डाकू म्हणावं?, असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला.

लोकांनी काँग्रेस पक्ष निवडला. आम्हाला आशीर्वाद दिला. पण त्यांनी आमची सरकारं चोरली. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही संसदेत उभे राहतो. तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने सभागृहावर प्रभाव टाकतात. जेव्हा आम्ही ऐकायला तयार असतो. तेव्हा ते बोलत नाहीत. आम्ही बोलायला उभे राहतो, तेव्हा ते ऐकायला तयार नसतात. आमची सहा सरकारं चोरली आणि काहींना पैसेही दिले, असं खर्गे म्हणाले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला १२५ दिवस पूर्ण झाले आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुरू झालेली यात्रा देशातील जनतेला जोडणारी आहे. आज भाजप सरकार, आरएसएसचे लोक समाजाला तोडत आहेत. त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या उणिवा लोकांना सांगण्यासाठी राहुल गांधी आलेत, असंही खर्गे म्हणाले.


हेही वाचा : बीबीसी माहितीपट : पाकिस्तानी वंशाच्या खासदाराचा आक्षेप ऋषी सुनक यांनी काढला खोडून