आग्रा (उत्तर प्रदेश) : बंगळुरू येथील अतुल सुभाष या इंजीनिअरने काही महिन्यांपूर्वी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्या काही महिन्यांनंतर कर्नाटकातील हुबळी येथील पेटारू गोल्लापल्ली या व्यक्तीने सुद्धा पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेला महिना उलटत नाही तोच आता उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका नामांकित कंपनीमध्ये मॅनेजर असलेल्या एका व्यक्तीने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. मानव शर्मा असे या व्यक्तीचे नाव असून त्याने पत्नीमुळे आत्महत्या केली आहे. मानव शर्माने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनववला होता, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Manav Sharma UP Agra TCS manager commit suicide like Atul Subhash after wife affair torcher)
काय आहे घटना?
समोर आलेल्या माहितीनुसार, आग्र्यातील मानव शर्मा हा नामांकित टीसीएस या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होता. त्याने 24 फेब्रुवारीला फाशी घेत आत्महत्या केली. परंतु, आत्महत्येपूर्वी त्याने 6 मिनिटे 56 सेकंदांचा एक व्हिडीओ बनवला आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या आत्महत्येला पत्नी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर कायद्याने पुरुषांचे बोलणे ऐकले नाही तर अशाच पद्धतीने आत्महत्या सारख्या घटना घडतील. हल्लीचे पुरुष खूप एकटे पडले आहेत, महिलांकडून कायद्याचा गैरवापर होत आहे, असेही त्याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तर कायद्याने पुरुषांनाही संरक्षण द्यावे, असे मानव शर्माने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.
हेही वाचा… Stock Market Crash : आठवड्याचा शेवटचा दिवस घसरणीचा, निर्देशांक एक हजाराहून अधिक अंकांनी गडगडला
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मानव शर्मा म्हणत आहे की, कायद्याने पुरुषांचेही रक्षण केले पाहिजे, नाहीतर अशी वेळ येईल की कुणीही पुरुष शिल्लक राहणार नाही, ज्याच्यावर आरोप करता येईल. माझ्या बायकोचे बाहेर संबंध होते. पण आता जाऊद्यात, मी ते माहीत असूनही शांत राहण्याचा प्रयत्न केला. पण ठीक आहे. मी नेहमीच सर्व सोडून दिले, तसे आताही करेल. पण मी आता पूर्णपणे निघून जाण्यास तयार आहे. तर, मी यापूर्वी अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, असे सांगत मानवने त्याच्या मनगटावरील कापलेल्या खुणा दाखवल्या.
यावेळी मानव शर्मा व्हिडीओमध्ये रडताना दिसला. व्हिडीओच्या माध्यमातूनच त्याने कुटुंबाची माफी मागितली. “पप्पा सॉरी, मम्मी सॉरी. मी गेल्यावर सगळं ठीक होईल. बरं, मला मरायचं कसे ते माहीत आहे. पण तोपर्यंत मी तुम्हाला पुन्हा विनंती करेन की तुमच्या आयुष्यातील पुरुषांबद्दल विचार करा. पण माझ्या आई-वडिलांना त्रास देऊ नका. माझ्या आई-वडिलांना हात सुद्धा लावू नका.” असेही त्याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. त्याने असे म्हणताच हा व्हिडीओ मधेच थांबला आहे.
या घटनेनंतर मानव शर्मा याच्या कुटुंबाने आग्रा येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाशिवरात्रीच्या ड्युटीमुळे पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुटुंबाने केला. यानंतर त्यांनी थेट उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार केली आणि अखेर गुरुवारी (ता. 27 फेब्रुवारी) रात्री व्हॉट्सअॅपवरून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परंतु, मानव शर्माच्या पत्नीने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर माझा पतीच मानसिकरित्या स्थिर नव्हता, असे तिने म्हटले आहे. तर याआधी त्याने तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असेही तिने सांगितले आहे.