घरदेश-विदेशमंदोस तामिळनाडूत धडकले; पाऊस-थंडीचा जोर वाढला, महाराष्ट्रात काय परिस्थिती?

मंदोस तामिळनाडूत धडकले; पाऊस-थंडीचा जोर वाढला, महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Subscribe

Mandos cyclone | मंदोस चक्रीवादळामुळे चेन्नईमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील एग्मोर परिसरात जोरदार वाऱ्यामुळे मोठी झाडे उन्मळून पडल्याने इंधन केंद्राचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मंदोस चक्रीवादळ (Mandos Cyclone) काल रात्री उशिरा तामिळनाडूच्या मामल्लापुरम किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे या किनारी भागात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. पाऊस आणि वादळामुळे येथे तीन तासांत 65 झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. दुसरीकडे, भारतीय हवामान खात्याने दिलासा देणारी बातमी दिली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे चक्रीवादळ आजपासून शांत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – दक्षिण भारतावर मंदोस वादळाचे संकट; महाराष्ट्र, गुजरातमध्ये पाऊस

- Advertisement -

चक्रीवादळ चेन्नईच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 30 किमी अंतरावर 12.7°N / 80.1°E जवळ मध्यभागी आहे. मात्र, आता चक्रीवादळाची ताकद कमी होत आहे. येत्या तासांत तामिळनाडूच्या वायव्य भागात ५५-६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. परंतु, सायंकाळपर्यंत वाऱ्याचा वेग ३०-४० किमी प्रतितास होईल. चक्रीवादळाचा मागील भाग जमिनीच्या दिशेने सरकत आहे, त्यामुळे येत्या काही तासांत त्याची लँडफॉल प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे तामिळनाडूच्या रानीपेट्टई, वेल्लोर, विलुप्पुरम, तिरुवन्नमलाई, सेलम, कल्लाकुरिची, तिरुपत्तूर जिल्हे आणि पुद्दुचेरी येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मंदोस चक्रीवादळामुळे चेन्नईमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील एग्मोर परिसरात जोरदार वाऱ्यामुळे मोठी झाडे उन्मळून पडल्याने इंधन केंद्राचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

मंदोसमुळे थंडी वाढली

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसह अनेक राज्यांमध्ये पारा सतत घसरत आहे. अनेक भागात थंडी वाढली आहे. पश्चिमी अडथळ्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगरावर बर्फवृष्टी आणि पाऊस पडत आहे. दरम्यान, उत्तर पाकिस्तान आणि त्याच्या लगतच्या भागातून पश्चिमी अडथळे पुढे सरकण्याची शक्यता असल्याने येत्या तीन ते चार दिवसांत हवामानाच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात परिस्थिती काय?

११ डिसेंबरपर्यंत मंदोसचा वेग थंडावणार आहे. मात्र, त्यानंतर ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गडगडाटाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंदोसच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, बीड, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यासह विदर्भातही पावसाची शक्यता आहे. पुढील ३ ते ४ दिवस काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहिल आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -