– सध्या लॉकडाऊनमुळे लग्नासारख्या पवित्र गोष्टी पुढे ढकलण्यात येत आहेत. मात्र तरीही काही जण घरातल्या घरात का होईना विवाह सोहळे पार पाडत आहेत. कारण विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो. वधू आणि वर दोघांनी लग्नाची अनेक स्वप्ने पाहिलेली असतात. शनिवारी दिल्लीत लॉकडाउनमध्ये असाच एक विवाह पार पडला. या विवाहाला फक्त दोन पाहुणे उपस्थित होते. ते म्हणजे दोन पोलीस अधिकाऱी. त्यांनी आपल्या गाडीतून नवरदेव आणि त्याच्या पालकांना कालकाजी आर्य समाज मंदिर हॉलमध्ये नेऊन सोडले.
दिल्लीतील गोविंदपुर येथे राहणाऱ्या कुशल वालियाचा पूजासोबत विवाह झाला. लॉकडाऊनमध्ये सगळच बंद असल्यामुळे पुजाने स्वत:ची तयारी स्वत: केली. अगदी हातावर मेहदीं काढण्यापासून ते मेकअप पर्यंत सगळं पुजानेच केलं. लग्नाच्या दिवशी पुजाने तीच्या आईची साडी नेसली.
#LockdownShaadi Vidai in a police gypsy. Bridegroom arrived in a police gypsy & after wedding took the bride in the same gypsy. Marriage took place after police permission. #DilKiPolice pic.twitter.com/w5qiqHLpcz
— Nitisha (@Nitisha_Kashyap) April 25, 2020
“आम्ही आधी विवाह पुढे ढकलण्याचा विचार केला होता. पण नजीकच्या काळात मोठा स्वागत सोहळा शक्य होणार नसल्यामुळे दोन्ही कुटुंबांनी साध्या पद्धतीन लग्न करण्याचा निर्णय घेतला” “लॉकडाउनमध्ये लग्न करताना पोलिसांची परवानगी आवश्यक होती. पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर ते मदत करण्यास तयार झाले” अशी माहिती नवरा मुलगा कुशलने दिली.
लग्नात जपले सामाजिक भान
कुशल आणि पुजाने लॉकडाऊनमध्येही लग्न करण्याचा निर्णय घेतला पण यावेळी त्याने लॉकडाऊनचे नियम पाळले. सामाजिक भानही जपले. लग्नाला उपस्थित असलेल्या मोजक्या मंडळींनी तोंडावर मास्क बांधला होता आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी जोडप्याला भेटवस्तू म्हणून ओढणी दिली. आणि पोलिसांच्या जिपमधून सासरी पाठवणी झाली.