बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत मागील काही काळापासून बरीच चर्चेत आहे. कंगना विविध राजकीय पक्ष आणि नेते यांच्यावर आरोप, तसेच त्यांच्याबाबत वादग्रस्त विधाने करत आहे. आता ती स्वतःच राजकीय पक्षात प्रवेश करण्याच्या विचारात असून तिने याबाबत एक ट्विट केले. कंगनासह राव साहेब दानवे, भाजप खासदार रवी किशन, मनोज तिवारी आणि रमेश बिधुरी यांच्याविरोधात काही शेतकऱ्यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. मात्र, हा खटला दाखल करणाऱ्यांपैकी काही जण हे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते असण्याची शक्यता आहे. याबाबत एका व्यक्तीने ट्विट केले. त्याच्या ट्विटला कंगनाने रिट्विट केले.
Another day another case, various political parties investing in me like I am some minister, every day I face political slandering, legal battles and opposition without having the support system/ resources of a politician, even though my only love is cinema but I might have to .. https://t.co/sGLTCNFaqU
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 10, 2021
‘आणखी एक दिवस, आणखी एक खटला. मी नेता असल्याप्रमाणे विविध राजकीय पक्ष माझी चौकशी लावतात. मला दररोज राजकीय टीका, न्यायालयीन खटले यांना सामोरे जावे लागते. मला राजकीय नेत्यांचा पाठिंबाही नसतो. माझे फक्त सिनेमावर प्रेम असले, तरी या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी मला बहुतेक राजकीय पक्षात प्रवेश करावा लागेल,’ असा इशारा कंगनाने तिच्या ट्विटमध्ये दिला.
कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडली आहे. कंगना आणि तिची बहिणी रंगोलीच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी काही दिवसांपूर्वी दोघींना वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहावे लागले होते. कंगनाच्या विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम २९४ अ आणि १५३ अ या कलमानुसार गुन्हा दाखल आहे.