देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यात ओमिक्रॉन व्हेरिएंटने भर घातली आहे. अशातच भारतातील ओमिक्रॉनबाधित रुग्णसंख्येवर आता एका ज्येष्ठ आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार न थांबणारा असून जवळपास प्रत्येकाला याची लागण होईल. यावर कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोसही निष्क्रिय ठरेल असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान ओमिक्रॉन हा सर्दीचे लक्षणं असलेला आजार आहे.
इंडियन काँन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या नॅशनल इन्स्टिट्यूड ऑफ एपिडेमियोलॉजीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ जयप्रकाश मुलीयल यांनी ओमिक्रॉन संसर्गाबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कोरोनाचा नवा स्ट्रेन खूपच हलका असून कोरोना हा भयावह आजार राहिलेला नाही यावर त्यांनी जोर दिला. तसेच या आजारामुळे आता रुग्णालयात दाखल होण्याची शक्यताही खूप कमी आहे. ते म्हणाले की, ओमिक्रॉन हा असा आजार आहे ज्याचा आपण सामना करु शकतो. अनेकांना या विषाणूची लागण झाल्याचेही समजणार नाही. यात 80 टक्क्यांहून अधिक लोकांना तर यांची लागण कधी झाली हे सुद्धा कळले नाही.
त्यांनी दावा केला की, कोरोना संसर्गामुळे नैसर्गिकरित्या प्राप्त केलेली रोग प्रतिकारशक्ती आयुष्यभर राहू शकते म्हणूनच भारतात इतर देशांप्रमाणे इतका वाईट परिणाम जाणवला नाही. यात कोरोनाविरोधी लस येण्यापूर्वी देशातील 85 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली होती. यावेळी कोरोनाविरोधी लसीच्या पहिल्या डोसने बुस्टर डोसचे काम केले. जगभरात अनेकांचा समज आहे की, नैसर्गिकरित्या होणारे संक्रमण कायमस्वरूपी प्रतिकारशक्ती देत नाही. पण माझा विश्वास आहे की हे चुकीचे आहे.
डॉ जयप्रकाश मुलीयल म्हणाले की, कोरोना व्हायरसचा संसर्ग अवघ्या दोन दिवसांत दुप्पट होत आहे. अशा परिस्थितीत ज्यावेळी कोरोना टेस्टचा रिपोर्ट येईल तोपर्यंत संक्रमित व्यक्तीने इतर अनेकांना संसर्ग केला असेल. त्याचवेळी लॉकडाऊनवर बोलताना ते म्हणाले की, आपण जास्त काळ घरात कोंडून राहू शकत नाही. त्यामुळे डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉन खूपच हलका आहे. हे समजून घेणे महत्वाचे आहे.