गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत झालेल्या मजूर, कामगार, विद्यार्थी आणि तीर्थ यात्रेला गेलेले यात्रेकरू यांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठीची मागणी राज्यांकडून केंद्राला केली जात होती. अखेर केंद्र सरकारने या मागणीला हिरवा कंदिल दाखवला असून लवकरच या परराज्यात अडकलेल्यांना त्यांच्या त्यांच्या घरी पाठवण्यात येणार असल्याचे समजते. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज यासंबंधीचा मोठा निर्णय घेतला असून तसे पत्रक जारी करून राज्यांना दिले आहे. त्यामुळे पायी हजारो किमी चालणाऱ्या कामगार, मजुरांना आता सरकारकडूनच त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
Ministry of Home Affairs (MHA) allows movement of migrant workers, tourists, students etc. stranded at various places. #CoronavirusLockdown pic.twitter.com/3JH2YPAuQU
— ANI (@ANI) April 29, 2020
गृहमंत्रालयाने आज एक आदेश काढला असून त्यामुळे देशभरात अडकून पडलेले पर्यटक, विद्यार्थी, मजूर आणि कामगारांना आपापल्या घरी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या निर्णयासोबतच काही अटी, नियम घालून दिले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन राज्यांना करायचे आहेत.
हे नियम पाळणे बंधनकारक
- एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यापूर्वी निघताना या मजुरांची मोडिकल चाचणी व्हावी
- त्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळली नाहीत तरच त्यांना जाण्याची परवानगी देण्यात यावी
- हे लोक त्या गावी गेल्यानंतर त्यांची तिथेही चाचणी करावी
- त्यांना होम क्वारंटाइन करण्यात यावे
- या सर्वांचा प्रवास हा बसमधूनच करण्यात यावा
- या लोकांना ज्या बसमधून येण्यात येईल त्या बसेस सॅनिटाईज करण्यात याव्या
लॉकडाऊनमध्ये कामगार, मजुरांनी घातला गोंधळ
महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीतून मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश, बिहारमधील लोकांनी परत जाण्याचा प्रयत्न या लॉकडाऊनच्या काळात केला. गुजरातमधील सूरत येथे जमलेला हजारोंचा मजूर वर्ग, मुंबईतील वांद्रे स्थानकात झालेली कामगारांची गर्दी तसेच दिल्लीतून आपापल्या गावी निघालेले लाखोंच्या संख्येतील मजूर या सर्व घटना लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या देशाने पाहिल्या आहेत. त्यामुळे काही राज्यांनी केंद्राकडे परराज्यात अडकलेल्या लोकांना घरी जाण्याची परवानगी मिळावी यासाठी विनंती केली होती. त्याला आता केंद्राने मंजुरी दिली आहे.