कोरोनाच्या महाभयंकर संकटाशी सामना करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन घोषित करुन आता ५० हून अधिक दिवस झाले आहेत. यानंतर लॉकडाऊनचा चौथा टप्पा घोषित केला जाणार आहे. त्यामुळे घरी परतण्यासाठी अधिर झालेल्या मजुरांनी मिळेल त्या वाटेने घर गाठण्यास सुरुवात केली आहे. चालत, सायकलने, भेटेल त्या वाहनातून मजुरांचा प्रवास सुरु आहे. राजस्थानच्या भरतपूर येथील एका मजुराने उत्तर प्रदेशमधील बरेली येथे जाण्यासाठी सायकलच चोरली. सायकलची चोरी केल्यानंतर गलितगात्र झालेल्या या मजुराने एक पत्र सोडले आहे, या पत्रातील मजकुरामुळे हे पत्र सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरले आहे.
मोहम्मद इक्बाल खान असे या मजुराचे नाव आहे. भरतपूर मधील सहानावली या गावातून साहीब सिंह नामक व्यक्तिच्या घराबाहेरील सायकल या मजुराने चोरली. आपल्या अंपग मुलाला बरेलीत परत नेण्यासाठी त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ही सायकल चोरी केल्यानंतर त्याने भरतपूर ते बरेली असा २५० किमींचा प्रवास पुर्ण केला. ही सायकल चोरी करत असताना मोहम्मदने एक पत्र लिहून साहीब सिंह यांची माफी मागितली आहे. मात्र पत्राच्या शेवटी लिहिलेली एक ओळ वाचून अनेकांचे हृदय पिळवटून निघाले आहे.
इक्बाल खानने पत्रात लिहिले की, “मी मजूर आहे आणि मजबूर देखील. मी तुमचा गुन्हेगार देखील आहे. तुमची सायकल घेऊन जात आहे. मला क्षमा करा. मला बरेलीपर्यंत जायचे आहे. माझ्याजवळ कोणतेच साधन नाही. शिवाय एक दिव्यांग मुलगा देखील सोबत आहे.” इक्बाल खानचा मुलगा चालू शकत नसल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज बांधला जात आहे, तशी प्रांजळ कबुली देखील त्याने दिली.
इक्बालच्या या पत्रामुळे देशभरातील मजुरांची काय अवस्था झाली आहे, याचा अंदाज बांधता येईल. आज दि. १६ मे रोजी उत्तर प्रदेशमध्ये एका रस्ते अपघातात २० मजुरांचा तर मध्य प्रदेशात ५ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात देखील रेल्वे पटरीवर झोपलेल्या १६ मजुरांना रेल्वेने चिरडले होते. तर देशात अनेक ठिकाणी चालत जात असताना थकवा आल्याने शेकडो मजुरांनी आपले प्राण रस्त्यावरच सोडले आहेत. मजुरांची ही अवस्था इंटरनेटच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचत आहे.