आज देशभरात तब्बल ७ लाख इंजिनिअर्स वर्षाला तयार होत आहेत. पण काही लोक फक्त पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. त्यांच्यात आवश्यक ती क्षमता विकसित होत नसल्याची खंत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत व्यक्त केली. ही खंत व्यक्त करताना आपल्याला संख्या महत्त्वाची नसून दर्जा महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त करताना हा दर्जा सुधारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. तर यासाठी सरकार ही तुमच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन यावेळी व्यक्त केले आहे.
आयआयटी मुंबईचा दीक्षांत समारंभ
आयआयटी मुंबईचा ५६ दीक्षांत समारंभ शनिवारी मुंबईत पवई कॅम्पसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील खंत व्यक्त केली. यावेळी एकूण २ हजार ६२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. तर ३८० विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आयआयटीच्या बोर्ड ऑफ गर्व्हनरर्सचे संचालक दिलीप संघवी आणि आयआयटीचे संचालक डॉ. देवांग खक्कर आदी उपस्थित होते.
एक हजार कोटींचा निधी
केंद्र सरकारतर्फे आयआयटी मुंबईला नुकताच इन्स्ट्यिट्यूट विथ इमिनेन्स हा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यानुसार आयआयटी मुंबईला पाच वर्षांसाठी एक हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आल्याची घोषणा मोदी यांनी यावेळी केली. त्यानुसार पाच वर्षांसाठी प्रत्येकी २०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. संशोधन, स्टार्ट अप यासारख्या गोष्टींसाठी हा निधी वापरायचा आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
‘आज आपल्या देशात अनेक गोष्टी या पारंपरिक पद्धतीने सुरु आहेत. त्या तातडीने सोडून देणे जर अवघड असते. समाज आणि सरकारी व्यवस्थेलादेखील यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आज हजारो वर्षांपासून सुरु असलेल्या अनेक पद्धतीत बदल करताना लोकांना त्यासाठी परावृत्त करणे थोडे अवघड असते. पण तुमचे विचार आणि तुमच्या कामात एकाग्रता, प्रेरणा आणि जिद्द असल्यास या सगळ्या समस्या नक्कीच मार्गी लागतात,’ अशा प्रकारे मार्गदर्शन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मत मांडलं. दरम्यान आपण अयशस्वी होणार हा विचार मनातून काढून टाका आणि जिद्द मनात बाळगा नक्कीच यश मिळेल, असं आवाहनही त्यांनी केलं.
संशोधन आणि इनोव्हेशनची मदत घेण्याचे आवाहन
आज सव्वाशे करोड देशवासियांचे जीवन सोपे कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आयआयटीसारख्या संस्थांनी सिटी बेस क्लस्टर ऑफ सायन्स सुरु करणे गरजेचे आहे. त्यासाठी संशोधन आणि इनोव्हेशनची मदत घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर देशातील सर्व नागरिकांचा विश्वास युवा पिढीवर असून पदवी मिळाल्यानंतर तुम्ही जे करणार आहात त्यावर भविष्यातील पिढीचे भविष्य अवलंबून असणार आहे. तर नवीन भारतदेखील यातूनच मजबूत होणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आयआयटीमधून बाहेर पडलेले माजी विद्यार्थी आज जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी आपला ठसा उमटवित असून त्यांचीही मदत घेण्याचे आवाहन यावेळी मोदी यांनी यानिमित्ताने केले आहे.
रमेश वाधवानी यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स
या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने डॉ. रमेश वाधवानी यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स या विशेष पदवीने सन्मानित करण्यात आले. आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांच्या हस्ते हा पदवी वाधवानी यांना बहाल करण्यात आली.
आयआयटीवर कौतुकाचा वर्षाव
देशाच्या प्रगतीत आयआयटी मुंबईसारख्या अनेक संस्थांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचा गौरव पंतप्रधानांनी यावेळी केला. आयआयटीला आपण सर्व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाने ओळखतो. पण आता ही व्याख्या बदलली आहे, आज फक्त टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमासाठी आयआयटी राहिलेली नसून ती आता इंडिया इन्स्टिमेंट ऑफ ट्रान्सफॉरमेंशन झालेली आहे. ज्यावेळी आपण परिवर्तनाच्या गोष्टी करतो त्यावेळी स्टार्ट अप हा महत्त्वाचा पैलू मानला जात असून त्या स्टार्ट अप पुढे आणण्यात आयआयटी मुंबईचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.