कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने दोनदा लॉकडाऊन घोषित केला होता. मात्र त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लाखो स्थलांतरीत मजूर अडकले होते. आता त्यांना आपापल्या राज्यात जाण्याची मुभा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. स्थलांतरीत मजूरांसाठी तसेच पर्यटक, विद्यार्थी आणि भाविकांना आपल्या राज्यात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात येणार आहे.
Ministry of Home Affairs allows the movement of migrant workers, tourists, students and other persons stranded at different places, by special trains. pic.twitter.com/cYFRCvTBLj
— ANI (@ANI) May 1, 2020
आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीत मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रेल्वे मंत्री पियूष गोयल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, कॅबिनेट सचिव राजीव गौबा आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा उपस्थित होते. रेल्वे मंत्रालयाने आपल्या सर्व झोन्सना निर्देश दिले आहेत की, राज्यांनी मजूरांना कुठे जायचंय याचा पाठपुरावा करावा. जर सगळं व्यवस्थित राहिले तर आणखी विशेष रेल्वे चालविण्यात येतील. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशने आपल्या कामगारांना परत आणण्यासाठी महाराष्ट्राला परवानगी दिली आहे. फक्त बिहार राज्याने अद्याप परवानगी दिलेली नाही.
मजूरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांनी केली होती. झारखंड सरकारने परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी एक विशेष रेल्वे तेलंगणा इथून धावली. तर दुसरी विशेष रेल्वे आज संध्याकाळी ६ वाजता केरळ ते ओडिशा दरम्यान धावणार आहे. केरळहून १२०० मजूर या रेल्वेतून ओडीशातील भुवनेश्वरमध्ये रवाना होणार आहे.