पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी खटला चालणार आहे. यासाठी गृह मंत्रालयाने आवश्यक परवानगी दिली आहे. या प्रकरणी सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लालूप्रसाद यादव, राबडी देवी आणि मिसा भारती यांच्यासह 16 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. परंतु घोटाळ्याच्या वेळी लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री होते, त्यामुळे खटला चालवण्यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी आवश्यक होती.
गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सीबीआयने ते पत्र दिल्लीतील राऊस एव्हेन्यू येथील विशेष न्यायालयात सादर केले आहे. त्यामुळे आता लालूप्रसाद यादव यांच्यासह सर्व आरोपींवर खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
In the land for job scam, CBI gets prosecution sanction against RJD chief Lalu Prasad Yadav.
(File photo) pic.twitter.com/qlb50WGysd
— ANI (@ANI) January 13, 2023
घोटाळ्यातील आरोपी मंत्र्यांवर खटला चालवण्यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक असते. आरोपी एखादा अधिकारी असेल तर, संबंधित विभागाकडून आवश्यक ती मंजुरी दिली जाते. चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालूप्रसाद यादव सध्या जामिनावर बाहेर आहेत. आता जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यावर त्यांना नव्याने जामीन घ्यावा लागणार आहे, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
सीबीआयने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये छापे टाकून 200हून अधिक विक्रीची कागदपत्रे जप्त केली होती. तर, ऑक्टोबर 2022मध्ये सीबीआयने लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगी मिसा भारती यांच्याव्यतिरिक्त मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक सौम्या राघवन, माजी सीपीओ रेल्वे कमलदीप मैनराय, पर्यायी स्वरुपात नियुक्त केलेले सात उमेदवार आणि इतर चार चौघांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
डिसेंबरमध्ये झाली किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया
गेल्या महिन्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी वडिलांना किडनी दिली होती. सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये लालूप्रसाद यादव यांच्यावर ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
हेही वाचा – विधान परिषद निवडणुकीसाठी आठ उमेदवारांचे अर्ज बाद; नाशिकची काय परिस्थिती?