नवी दिल्ली : मध्य प्रदेशात निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष आपली पूर्ण ताकद लावून निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी शुक्रवारी सतना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बीटीआय मैदानावरील जाहीर सभेला संबोधित करताना भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. (Narendra Modi claims to be an OBC Rahul Gandhi Targeting raising the issue of caste census)
उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदीजी म्हणतात की, मी ओबीसी आहे, पण ते दोन कोटींचा सूट घालतात. ते चहावर बोलून पंतप्रधान झाले, पण ते आता चहावर बोलताना दिसत नाहीत. मोदी दिवसातून किमान एक किंवा दोन सूट घालतात. पण त्यांना कधी दोन दिवसांतून एक सूट घातलेला तुम्ही पाहिला आहे का? असा सवाल करत मी फक्त सफेद टीशर्ट घालतो, मात्र मोदी रोज लाखो रुपयांचे नवीन कपडे घालतात, कोट्यावधीच्या विमानातून फिरतात, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा – प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी…; सर्वोच्च न्यायालयाची ‘या’ राज्यांना ताकीद
राहुल म्हणाले की, देशात सध्या दोन प्रकारचे सरकार आहे. एक गरिबांच्या खिशात पैसे टाकतोत तर दुसरं सरकार बड्या उद्योगपतींच्या खिशात पैसे टाकतो. काँग्रेसने गरीबांना मनरेगा आणि अन्नाचा अधिकार दिला तर, भाजपाने नोटाबंदी, जीएसटी दिली. शेतकऱ्यांवर काळे कायदे आणण्यात हा फरक आहे, असा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, भाजपा अदानींना पैसे देते. तो पैसा अदानी परदेशात खर्च करतात. अदानी अमेरिका, दुबई, जपान येथे जाऊन घरे खरेदी करतात. तुमच्या जीएसटीचा पैसा अदानींच्या खिशात जातो आणि बाहेर खर्च होतो. आम्ही पैसे दिले तर शेतकरी छोट्या दुकानात जाऊन माल खरेदी करतात आणि अर्थव्यवस्थेला मदत करतात, असे ते म्हणाले.
मध्य प्रदेशात शेतकरी, मजूर आणि छोटे व्यापारी घाबरले आहेत. देशात एकच जात गरीब आहे, असे म्हटले जाते. मी जात जनगणनेबद्दल बोललो म्हणून देशातील जाती त्यांच्या मनातून नाहीशा झाल्या. ज्या दिवसापासून मी ओबीसी, दलित, आदिवासी लोकसंख्येबद्दल बोललो तेव्हापासून मोदी म्हणत आहेत की, राहुल गांधी देशात जात नाही, जात संपली. मात्र मध्यप्रदेशात सरकार येथील आमदार चालवत नाही, तर अधिकारी चालवतात, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
हेही वाचा – Supreme Court: ‘हिंदू खतरे में’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळली
जात-आधारित जनगणना करणे पहिले काम
राहुल गांधी म्हणाले की, जातीवर आधारित जनगणना हे एक क्रांतिकारी पाऊल आहे, जे लोकांच्या जीवनात बदल घडवून आणेल. काँग्रेस सत्तेत आल्यास मध्य प्रदेशात तसेच राष्ट्रीय स्तरावर जात जनगणना केली जाईल. मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर राज्यातील इतर मागासवर्गीयाची (ओबीसी) नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी जात-आधारित जनगणना करणे हे पहिले काम आमचे असेल. यामुळे ओबीसींसह सर्वच घटकांची परिस्थिती पुढे येईल, त्यानुसार त्यांच्या हिताची धोरणं आखली जातील. हे पाऊल लोकांसाठी क्रांतिकारक आणि जीवन बदलणारे ठरेल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
मध्यप्रदेशात फक्त एक ओबीसी आयएएएस
पंतप्रधान नेहमी ओबीसी असल्याचे सांगतात, मात्र काँग्रेसने देशात जात जनगणना करण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी याबाबत बोलणे बंद केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. मध्य प्रदेशात राज्य चालवणाऱ्या 53 आयएएस अधिकाऱ्यांमध्ये फक्त एक ओबीसी आहे. याचाच अर्थ राज्याचे एकूण बजेट 100 रुपये असेल तर ओबीसी अधिकाऱ्याचे केवळ 33 पैसे किंवा 0.03 टक्क्यांवर नियंत्रण असेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
हेही वाचा – धनत्रयोदशीला 30 मिनिटांत दरोडेखोर झाले श्रीमंत; 20 कोटींचे दागिने लुटले
18 वर्षात 18,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
गेल्या 18 वर्षात मध्य प्रदेशात सुमारे 18,000 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा आरोपही गांधी यांनी केला आहे. बेरोजगारीचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ने लहान-मध्यम व्यवसाय आणि व्यापाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची परिस्थिती निर्माण झाल्याचेही राहुल गांधी म्हणाले.