केरळ राज्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आता दक्षिण-पश्चिम मान्सूनचे महाराष्ट्रासह ईशान्य भागात दमदार आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रविवारी सुरु झालेल्या दमदार मान्सूनने महाराष्ट्रातील ३० टक्के भाग व्यापत पुणे आणि रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. यात आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्याभरात मुंबईतही मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. परंतु यंदा मान्सून केरळात सामान्य वेळेपेक्षा लवकरचं पोहोचला आहे. सध्या मान्सूनने ईशान्येकडील भाग व्यापला असून तेथील अनेक भागांत दमदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.
मान्सूनची सोलापूर, मराठवाडा, आंध्रप्रदेशात आगेकूच
दक्षिण पश्चिम मान्सूनने महाराष्ट्रात जोरदार धडक दिली असून रत्नागिरी जिल्ह्यातील हार्ने किनारपट्टी भागात मान्सून औपचाकरित्या पोहचला आहे. यातच येत्या काही काळात सोलापूर, मराठवाडाच्या काही भाग आणि त्यानंतर तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात मान्सूनची आगेकूच होणार आहे.
देशात ७ ते ८जूनदरम्यान कमी पाऊस
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे की, दक्षिण-पश्चिम मान्सूनने मध्य अरबी समुद्रासह, कर्नाटक, महाराष्ट्र, , तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, मध्य बंगालचा उपसागरातील काही भागांत आगमन केले आहे. यावर भारतीय हवामानशास्त्र विभागाचे राजेंद्र जेनामानी म्हणाले की, देशात ७ ते ८जूनदरम्यान कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये सामान्य पाऊस पडण्याची शक्यता
तसेच ११ जूनपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण तयार होण्यास मदत होईल आणि ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहारमधील काही भागांत मान्सून सरकण्याची शक्यता आहे. यंदा दोन दिवस उशीरा म्हणजे ३ जूनला मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावली. मात्र जूनमध्ये सामान्य पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.
देशातील बर्याच भागात दमदार पावसाला सुरुवात
हवामान खात्याने सांगितले की, येत्या पाच दिवसात देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. राजस्थान , उत्तर प्रदेश, हरियाणा, सौराष्ट्र, गुजरातमधील कच्छ आणि ओडिशामधील काही भागांत कमाल तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उत्तर प्रदेशातील बांदामध्ये सर्वाधिक म्हणजे ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आयएमडीने म्हटले आहे की, येत्या पाच दिवसात देशात उष्णतेच्या लाटाची परिस्थिती उद्भवण्याचा कोणताही अंदाज नाही. दरम्यान, उत्तर भारतासह देशातील बर्याच भागात पाऊस पडत आहे.
दिलासा : मान्सून अलिबाग, रायगडमध्ये दाखल