राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनसाठी सक्रिय वातावरण निर्माण झाले आहे. पुढील 2 दिवसात केरळ आणि लक्षद्वीपमधील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे केरळमध्ये पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. तर काही भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात 45 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आज अंदमान, निकोबार बेटे व आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. यामुळे राज्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडे 7 राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पूर्वमोसमी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुखकर धाला आहे. यामुळे येत्या दोन दिवसात हे वारे दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात दाखल होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.
चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे पुढील 5 दिवस तामिळनाडू व कर्नाटक किनारपट्टी, केरळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांमध्ये 16 ते 19 मे पर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (येलो ॲलर्ट ) हवामान विभागाने दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.