यंदाचा २०२१ साठीचा संपुर्ण देशातील मॉन्सूनचा मुक्काम लांबल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र (IMD) मार्फत जाहीर करण्यात आली आहे. राजस्थानातून यंदा मॉन्सून उशिरा निघणार असल्याचेही आयएमडीने स्पष्ट केले आहे. यंदा जवळपास ७ ऑक्टोबर किंवा ८ ऑक्टोबरला मॉन्सून परतीचा प्रवास सुरू करेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरवर्षीच्या तुलनेत मॉन्सूनचा मुक्काम वाढला आहे. यंदा सरासरी ऑक्टोबरपर्यंत मुक्काम लांबला आहे. आगामी दहा दिवस तरी मॉन्सूनचा मुक्काम देशात कायम राहील असे अंदाज आहे.
Monsoon staying bit longer this year…
🌧☔☔🌨🌧🌈🌧🌩☔🌈⛅🌾🌾🐥 pic.twitter.com/CckNuit1hh— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 24, 2021
साधारणपणे मॉन्सूनचा मुक्काम हा देशात १७ सप्टेंबर पर्यंत असतो. त्यानंतर साधारणपणे ३० सप्टेंबरपर्यंत मॉन्सूनचा देशातील परतीचा प्रवास सुरू होतो. पण यंदा मात्र मॉन्सूनचा मुक्काम हा येत्या १० ऑक्टोबरपर्यंत असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यंदा मॉन्सूनचा देशातील मुक्काम दोन आठवड्यांनी वाढणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभाग (IMD) ने स्पष्ट केले आहे.
यंदाच्या वर्षी बंगालच्या खाडीतून दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापैकी एका कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम हा २६ सप्टेंबरपासून जाणवायला लागेल. तर दुसऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम हा दोन ते तीन दिवसांनी जाणवेल, असे प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख मृत्यूंजय महापात्रा यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला सांगितले. परिणामी मध्य भारतात तसेच पूर्व आणि उत्तर पश्चिम भारतात पावसाचा मुक्काम वाढेल. आयएमडीने याबाबतचा विस्तारीत अंदाज गुरूवारी जाहीर केला आहे.
यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच असे घडते आहे की एकट्या सप्टेंबर महिन्यात पाच कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याच्या घटना घडल्या आहेत. यंदाच्या वर्षी जुलैमध्ये चार कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले तर जून आणि ऑगस्टमध्ये दोन अशा स्वरूपात हे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले होते. यंदाच्या वर्षी मॉन्सूनचा विड्रॉअल हे दहा दिवस उशिरा सुरू होईल. यंदा १० ऑक्टोबरपर्यंत हा मुक्काम असणार आहे, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.