देशात कोरोनाचा कहर गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेवर आणखी ताण येत आहे. हा कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी काही जिल्ह्यात लॉकडाऊन देखील लावण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशातील कोरोनाच्या नवीन म्युटेंटमुळे तरुणांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. तसेच तरुण हे मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असल्यानेही त्यांच्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर हा १० टक्क्याहून जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले. देशातील कोरोनाच्या सध्यस्थिती बद्दल बोलतांना त्यांनी भारतातील ७१८ जिल्ह्यांपैकी दोन तृतीयांश जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर हा १० टक्क्यांहून अधिक असल्याची माहितीही दिली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बालकांना?
देशात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या तिसऱ्या कोरोनाच्या लाटेत लहान बालकांना मोठा फटका बसू शकतो, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बालकांच्या कोरोना लसीकरणासंदर्भात बोलतांना त्यांनी असे म्हटले की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे संक्रमण झालेल्या वयोगटात जास्त अंतर नाही. त्यामुळे तिसरी लाट ही बालकांसाठी जास्त धोकादायक आहे. डॉ.बलराम भार्गव यांनी गेल्या माहिन्यात कोविड टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीतदेशात लॉकडाऊन लावण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर राज्यांनी मायक्रो कन्टेन्मेन्ट झोनवर लक्ष केंद्रीत करावं आणि लॉकडाऊनचा पर्याय हा शेवटचा असेल
असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होते.
राज्यात लॉकडाऊनचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढणार
देशात कोरोनाचा उद्रेक कायम असून गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा गाठला होता. आता त्याचा आलेख घसरताना दिसत आहे. भारतात सर्वाधिक रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढणार असल्याचे सूतोवाच सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी केले. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री हेच अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत रूग्णवाढीचा दरही घसरला आहे. त्यामुळे सध्या राज्यात असलेले निर्बंध ३१ मे पर्यंत वाढवावेत, असेच मत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.