देशाच्या राजकारणात वारंवार भाजपाकडून विरोधक काँग्रेसवर टीकास्त्र सोडले जात असते. अशातच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनी धक्कादायक विधान केले आहे. ‘विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेला मुलगा देशभक्त होऊच शकत नाही. हे राहुल गांधी यांनी ठरवले आहे. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही असे ते परदेशात जाऊन सांगतात. यापेक्षा लज्जास्पद काय असेल? मी राहुल गांधी यांचा निषेध करते. त्यांना देशाच्या बाहेर हाकलून दिले पाहिजे’, असे विधान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. (MP Pragya Singh Thakur said Rahul Gandhi should be thrown out of country BJP Congress)
शनिवारी भोपाळ-दाहोद ट्रेनला खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, त्यांनी राहुल गांधींच्या देशभक्तीवरच सवाल केला. संसदेत चांगले काम सुरू आहे. सर्व काही चांगले होत आहे. मात्र, काँग्रेसचे लोक संसद चालू देत नाहीत. त्यांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होत चालली आहे. राहुल गांधी देशाचे नेते आहेत. तुम्हाला लोकांना निवडून दिले आहे. तरीही तुम्ही परदेशात जाऊन देश आणि देशातील जनतेचा अपमान करत आहात?, असा सवाल साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला.
#WATCH | While sitting abroad, you (Rahul Gandhi) are saying you are not getting an opportunity to speak in Parliament. Nothing can be more shameful than this. He should not be given a chance in politics& should be thrown out of the country: BJP’s Pragya Thakur, in Bhopal (11.03) pic.twitter.com/ZBDrZFjepx
— ANI (@ANI) March 12, 2023
“तुम्ही भारताचे नाहीत हे आम्ही मान्य केलं आहे. कारण तुमची आई इटलीची आहे. परदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेला मुलगा कधीच देशभक्त होऊ शकत नाही. हे आम्ही सांगत नाही. तर चाणक्यानेच तसे लिहून ठेवले आहे. चाणक्यांनी जे म्हटले, तसेच राहुल गांधी वागत आहेत. इतके वर्ष तुमचे देशात सरकार होते. तुम्ही देशाला पार पोखरून टाकले होते”, अशी टीकाही यावेळी साध्वी प्रज्ञा यांनी केली.
नेमके काय म्हणाले राहुल गांधी?
“आमच्याकडचे माईक खराब नाहीत. आमच्याकडचे माईक सुरू आहेत. पण तुम्ही ते सुरू करू शकत नाहीत. जेव्हा खासदार म्हणून मी बोलायला लागतो तेव्हा माईक बंद केला जातो. असं अनेकवेळा घडलं आहे. भारतात विरोधी पक्षाचा आवाज दाबला जात आहे”, असं राहुल गांधी म्हणाले होते.
हेही वाचा – संजय राऊत भ्रष्ट कारखान्याची तक्रार फडणवीसांकडे पाठवणार, हसन मुश्रीफांचा फोटो ट्वीट करत म्हणाले…