उत्तरप्रदेशातील हाथरस येथील प्रकरणानंतर संपूर्ण देशात रोष व्यक्त केला गेला. मात्र अद्याप देशात महिला सुरक्षित नसल्याचे चित्र दिसतेय. दरम्यान मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात पोलीसांनी तुरुंगात महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
रीवा जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेने पोलीस लॉकअपमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. कोठडीमध्ये तब्बल दहा दिवस पाच पोलिसांनी मिळून आपल्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मे महिन्यातील असून पीडित महिला हत्या प्रकरणात आरोपी आहे. सध्या ती तुरुंगात बंद आहे. १० ऑक्टोबरला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि वकिलांची टीम तुरुंगाची पाहणी करण्यात गेली होती. त्यावेळी ही घटना समोर आली.
पोलीस ठाण्यातच केला बलात्कार
पीडित महिला हत्या प्रकरणात आरोपी असून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी न्यायिक चौकशीचे आदेश देण्यासाठी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि वकिलांची टीम तुरुंगात दाखल झाले होते. त्यावेळी चौकशीचे आदेश देण्याआधी पीडित महिलेने पोलिसांवर बलात्काराचा आरोप केला. या महिलेने पथकाला असे सांगितले की, ९ मे ते २१ मे या कालावधीत पाच पोलिसांनी पोलीस ठाण्यातच आपल्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेबद्दल तीन महिन्यापूर्वीच जेल वॉर्डनला सांगितले होते.