देशासह जगभरात अजूनही कोरोनाचे संकट घोंघावत आहे. यादरम्यान अनेक धोकादायक आजार समोर येताना दिसत आहे. त्यापैकी एक म्हणजे म्युकरमायकोसिस (काळी बुरशी). देशातील २६ राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे संकट गडद होत आहे. केंद्र सरकारने म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी अॅम्फोटेरेसिनी बी (Amphotericin B) इंजेक्शनच्या ३० हजार १०० कुपीचे वाटप केले आहे. पण केंद्र सरकारने केलेले इंजेक्शनचे हे वाटप एकूण मागणीच्या १० टक्के सुद्धा नाही आहे.
केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी सांगितले की, ‘सोमवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ३० हजार १०० अॅम्फोटेरेसिनी बी इंजेक्शनची एक खेप दिली आहे. देशातील आता जवळपास २० हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत, ज्यांना दररोज ३० हजार इंजेक्शन पाहिजे. एका दिवसात दोन वेळा इंजेक्शन दिले जाते आणि सुमारे सहा आठवड्यांसाठी द्यावे लागते.
‘या’ राज्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण नाहीत
केंद्रीय मंत्र्यांनी पुढे सांगितले की, ‘अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, दादरा नगर हवेली. लडाख, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, मिझोरमा, सिक्कीम आणि नागालँड या राज्यांना सोडून उर्वरित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. देशात आता एक लाख इंजेक्शनची उत्पादन क्षमता आहे.’
देशात सात राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण
आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे येथे सर्वाधिक इंजेक्शनचे वाटप केले आहेत. शिवाय केंद्र सरकारच्या रुग्णालयात देखील अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे सरकारने या रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांसाठी १ हजार २६० इंजेक्शनच्या कुपीचे वाटप केले आहेत.’