भाजपने नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभरात आयोजित केलेल्या गरबा कार्यक्रमांवर शिवसेनेकडून ठीकेची झोड उठवली जात आहे. यात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातूनही आज भाजपला खोचक टोला लगावण्यात आला. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दंडियाने इंचभरही हलणार नाही अशी खोचक टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर केली आहे. ज्यावर आता मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आशिष शेलार म्हणाले की, ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली. अडीच वर्षे मंदिरात देव बंदिवान केले. ज्यांनी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सावाची धूम सुरु आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय. मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय त्यांना आमचा एकच सल्ला मग घ्या ना धौती योग असा खोचक टोला शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
…मग घ्या ना धौती योग!
(आमची सच्चाई रोखठोक!)@BJP4Mumbai @BJP4Maharashtra @ShivSena @OfficeofUT pic.twitter.com/V8F209jQa1— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 28, 2022
शेलार पुढे म्हणाले की, भाजप दरवर्षीच सगळे उत्सव साजरा करते, महाराष्ट्रातील माणसाच्या सुख- दुखात सहभागी होते. त्याचे कधीच राजकारण केले नाही. कोरोना, वादळ, अतिवृष्टी या संकटात भाजपा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते घरात बसून राहिले नाहीत. घरोघरी जाऊन मदत करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे करून दाखवले होर्डिंग लावले नाहीत असा चिमटाही भाजपने काढला आहे.
पण जेव्हा आम्ही उत्सव अशा थापा मारणाऱ्य़ांकडे आता थापा पण राहिला नाही आणि उत्सवही नाही, यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली. लालबाग, परळ, शिवडीत मराठी दांडिया भाजपाने आयोजित केल्या त्याचा सामनाकारांना आणि पेग्विंग सेनेला एवढा त्रास का झाला? असा सवाल करत याकूबच्या कबरीचे शुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच असंही भाजपाने म्हटलं.
अहंकार, गर्वहरण करणाऱ्या दुर्गेचा, शारदेचा अंबेचा हा उत्सव आहे. या उत्सवात ज्यांना राजकीय जळजळ होतेय. राजकीय वाद काढून क्लेश करुन तुझ्या भक्तांच्या आनंदात विरजण घालत आहेत. त्यांच्यासाठी अंबे माते तुझ्या चरणी एकच प्रार्थना, प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासून सोडवी,तोडी भवपाशा असं म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची तोफ डागली आहे.