देशाची आर्थिक राजधानी मुंबईने कोरोना रुग्णांच्याबाबतीत चीनच्या वुहान शहराला मागे टाकलं आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा ५१ हजार १०० वर पोहोचला आहे. तर चीनच्या वुहान शहरातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला त्या शहरात कोरोनाचे ५० हजार ३३३ रुग्ण आहेत. यामध्ये ३ हजार ८६९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वात मोठा हॉटस्पॉट महाराष्ट्राने चीनला मागे टाकलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे ९० हजाराहून अधिक रुग्ण आहेत, तर ८४ हजार रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजार ७८७ वर पोहोचला आहे. तर राज्यात आतापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ४४ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ३ हजार २८९ जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी २ हजार २५९ नव्या रुग्णांचा नोंद झाली. तर एका दिवसात राज्यात १२० जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ हजार ६६३ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
हेही वाचा – भयंकर! मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल्समधून सहा मृतदेह गायब
राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. सरकारी तसंच खासगी कार्यालये सुरु करण्यात आली आहेत. तसंच दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन हळूहळू उघडण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तथापि, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, पेस्ट कंट्रोल आणि टेक्निशिअन अशांना काम करायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्यात धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल्स, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स सुरु करायला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.