पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याविषयी देशभरातून काळजी आणि आपुलकी व्यक्त केली जात आहे. अभिनंदन यांनी भारतात सुखरुप परतावे, यासाठी लाखो देशवासीय प्रार्थना करत आहेत. इतकंच नाही तर या वीरपुत्राचे कुटुंबियही त्यांच्या परतीकडे डोळे लावून बसले आहेत. पाकिस्तानी सुरक्षा दलाने अभिनंदन यांचे रक्तबंबाळ झालेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर संपूर्ण देश हळहळला. अभिनंदन यांचे काकांनी ट्वीट करुन सरकारकडे अभिनंदन यांना सुरखरुप परत आणण्यातची मागणी केली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अभिनंदन यांचे वडील सिमहाकुट्टी वर्धमान यांनीही एक भावूक पत्र लिहीले आहे. आपला मुलगा शत्रूच्या ताब्यात सापडलेला असताना वडिलांनी लिहीलेलं हे पत्र खरोखरंच कुणालाही भावूक करुन टाकणारं आहे.
अभिनंदन यांचे वडील म्हणतात…
”ईश्वराची आमच्यावर कृपादृष्टी आहे, त्यामुळे अभिनंदन जिवंत आहे. तो सुखरुप आहे. पाकिस्तानच्या तावडीत असून सुद्धा किती धैर्याने तो बोलत आहे. दरम्यान, अशा कठीण प्रसंगी देशातील सर्वांनी साथ दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. लोकांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे आम्हाला बळ मिळत आहे. मला खात्री आहे की याच सदिच्छांच्या जोरावर माझा मुलगा नक्की भारतात परतेल.”
अभिनंदन वर्धमान यांचे वडील सिमहाकुट्टी वर्धमान भारतीय हवाई दलातून एअर मार्शल म्हणून निवृत्त झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने पुलवामध्ये केलेल्या हल्ल्याला भारतीय वायुदलाने चोख प्रत्युत्तर दिले. भारताने जैश ए मोहम्मद यांचे तळ उद्वस्त करत सुमारे ३५० दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर भारताच्या हद्दीत घुसलेले पाकिस्तानचे एक लढाऊ विमानही पाडले. मात्र, दुर्देवाने भारताचे मिग २१ हे लढाऊ विमानदेखील यादरम्यान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. या विमानाचे चालक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान होते. सूत्रांनुसार, आपले विमान पाकच्या हद्दीत पडल्यानंतर त्यामधून बचावलेल्या अभिनंदन यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले. पाकिस्तानने अभिनंदन यांना मारल्याचे, रक्तबंबाळ केल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. यामुळे तमाम भारतीयांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात राग दाटला आहे. या सर्वच घटनांमुळे सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे.