हरियाणा : हरियाणातील अंबाला शहरातील बलाना गावात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे कुटुंब रात्रीचे जेवन करुन झोपले, परंतु त्यातील एकही जण सकाळी उठलं नाही. ज्यामुळे हा घातपात आहे की सामूहिक आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहे. एकाच कुटुंबातील 6 जणांच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेतील सुखविंदर सिंग याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर त्याचे वडील संगत राम आणि आई महिंद्रो यांच्यासह त्यांची पत्नी रीना, 7 वर्षींची मुलगी जस्सी आणि 5 वर्षांचा मुलगा आशु यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला.
पोलिसांकडून चौकशी सुरु
या प्रकरणाची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. स्थानिक पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यात सुखविंदर यांनी आपल्या मृत्यूचे कारण लिहिले आहे. सुखविंदर ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीकडून त्याला त्रास देण्यासह 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
सुखविंदरने सुसाईड नोटमध्ये पुढे लिहिले की, साई होंडा यमुनानगरचा मालक कवी नरुला आणि बाल किशन ठाकूर हे त्याच्या मृत्यूस कारणीभूत आहेत, ते मला पैसे देऊन नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत होते. या सुसाईट नोटनुसार पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यापूर्वी मध्य प्रदेशातील इंदूर शहरातूनही अशीच एक घटना समोर आली होती. जिथे वाढत्या आर्थिक कर्जाला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती.