नारायण मूर्ती दिल्लीकरांवर संतापले; म्हणाले, हे तर सर्वाधिक बेशिस्त शहर

Narayan Murthy on Delhi Traffic | ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या स्थापना दिनी ते बोलत होते.

delhi traffic
प्रातिनिधिक छायाचित्र

Narayan Murthy on Delhi Traffic | नवी दिल्ली – इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी मंगळवारी दिल्लीतील बेशिस्त नागरिकांवर संताप व्यक्त केला. दिल्ली हे सर्वाधिक बेशिस्त शहर असल्याचं ते म्हणाले. येथे वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं जात नाही. त्यामुळे येथे यायला अडचण जाणवते, असं मूर्ती म्हणाले. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या स्थापना दिनी ते बोलत होते.

हेही वाचा – भारतात भूकंप येण्याची शक्यता, NGRIच्या शास्त्रज्ञाने दिला इशारा

नारायण मूर्ती म्हणाले की, “दिल्लीत आल्यानंतर मला सर्वाधिक असुविधा मिळते. कारण या शहातील लोक बेशिस्त आहेत. काल मी विमानतळावरून येत होतो. लाल सिग्नल सुरू असतानाही बाईक आणि स्कूटरचालक वाहतूक नियमांचं उल्लंघन करत होते. आपण पुढे जाण्यासाठी एक-दोन मिनिटेही थांबू शकत नसू तर, समोर पैसे असल्यावर आपण थांबू का? अजिबातच नाही.”


“नागरिकांनी सार्वजनिक संपत्तीची काळजी खासगी संपत्तीप्रमाणेच घेतली पाहिजे. यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणातील नुकसान टाळता येईल. देशाने उदारमतवादी भांडवलशाही अंगीकारण्याची गरज आहे. तसंच, कॉर्पोरेट जगात योग्य मुल्यांचाही विकास झाला पाहिजे,” असंही मूर्ती म्हणाले. आयए मानवाची जागा घेईल असं म्हटलं जातंय. परंतु, असं कधीच शक्य नाही. कारण, मानवाकडे बुद्धीची ताकद आहे, असं नारायण मूर्तींनी पुढे स्पष्ट केलं.

देशाची आर्थिक राजधानी दिल्लीत वाहतुकीच्या नियमांचा फज्जा होत असल्याचं सातत्याने समोर आलं आहे. त्यामुळे वाहतूक नियमन सुरळीत व्हावं याकरता सम-विषम योजनाही लागू करण्यात आली होती. परंतु, तरीही दिल्लीकर कोणत्याही नियमांचं पालन न करता वाहतुकीच्या नियमांचा फज्जा उडवत असल्याचं सातत्याने स्पष्ट झालं आहे. यावरूनच नारायण मूर्ती यांनी संताप व्यक्त केला आहे.