केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सीतारामन यांनी ५ नदीजोड प्रकल्पांबाबत मोठी घोषणा केली आहे. ५ नदीजोड प्रकल्पांची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पांमधील पाच प्रकल्प हे खूप महत्त्वाचे असून त्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. दमणगंगा-पिंजाळ, पार- तापी-नर्मदा, गोदावरी-कृष्णा, कृष्णा-पेन्नार आणि पेन्नार-कावेरी या ५ नदीजोड प्रकल्पांच्या डीपीआरचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे. संबंधित राज्यांमधील लाभार्थ्यांमध्ये सहमती झाली की केंद्राकडून पाठबळ पुरवले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
केन-बेटवा प्रकल्प आणि नदी जोडणी प्रकल्प
केन-बेटवा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली असून जवळपास ४४ हजार ६०५ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच जलसिंचन योजनेतून ९.६२ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. ६२ लाखांहून अधिक लोकांना पिण्याच्या पाण्याची योजना देण्यात येणार आहे. १०३ मेगावॅट हायड्रो आणि २७ मेगावॅट सौर ऊर्जेचा पुरवठा केला जाणार आहे.
नदीजोड प्रकल्प कशासाठी ?
देशभरात अन्न-धान्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी हा नदीजोड प्रकल्प उपयुक्त असणार आहे. पूर आणि दुष्काळ परिस्थितीमध्ये कमतरता आणण्यासाठी आणि पाण्याच्या उपलब्धतेमध्ये असलेला प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी राष्ट्रीय जल विकास संस्थाने एक सर्वात प्रभावी मार्ग शोधून काढला आहे.
दरम्यान, केन-बेटवा नदी प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प असून उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या प्रदेशाअंतर्गत येणाऱ्या केन-बेटवा जोड प्रकल्पाला भारत सरकारने राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. या प्रकल्पामध्ये पन्ना व्याघ्र संरक्षण क्षेत्राचा सुमारे ८६५० हेक्टर भूभागाचा समावेश आहे. नदीजोड प्रकल्पाची संकल्पना प्रथम ब्रिटिश अभियंता ऑर्थर कॉटन यांनी मांडली होती. १९३५ मध्ये सर विश्वेश्वरय्या यांनीही या प्रकल्पाला दुजोरा दिला होता.
हेही वाचा : Budget 2022 : सहकार क्षेत्रांना आता १५ टक्के कर, सहकार क्षेत्रासाठी मोठी घोषणा