देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, दिलासादायक बातमी म्हणजे भारत देशात वेळत लॉकडाऊन केल्यामुळे जगात इतर देशांपेक्षा भारतामध्ये मृत्यूदर सर्वात कमी झाला आहे. लॉकडाऊन, चाचण्या आणि रुग्णांवरील योग्य उपचारामुळे एकूण लोकसंख्येच्या दर १ लाखामागे ०.३ टक्के इतकाच मृत्यूदर राखण्यात भारताला यश आले आहे. मात्र, दुसरीकडे जगातील देशांचा सरासरी मृत्यूदर हा ४.४ टक्के इतका आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे. तसेच जगातील काही देशांमध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे ८१.२ इतक्या मृत्यूंची नोंद झाल्याचेही ते म्हणाले आहेत.
अशी तोडण्यात आली साखळी
लॉकडाऊन, चाचण्या आणि रुग्णांना वेळेवर देण्यात आलेल्या उपचारांमुळे भारताचा मृत्यू दर कमी करण्यात भारताला यश आले आहे. तसेच लॉकडाउन, कंटेनमेंट आणि नियमांमुळे आपल्याला कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडता आली. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचेही दिसत नसल्याचे ते म्हणाले आहेत.
सोशल डिस्टन्सिंग आणि नियम पाळणे गरजेचे
कोरोना विषाणूवर अद्याप लस आली नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि नियम पाळणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंगनेच आपल्यासाठी लसीचे काम केले आहे. लोकांच्या पाठिंब्यांमुळेच आपल्याला करोनाच्या लढाईत यश मिळाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे असल्याचेही अग्रवाल म्हणाले.
६० हजार ४९० रुग्ण झाले बरे
देशातील कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहे. आतापर्यंत ६० हजार ४९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारत देशाची स्थिती चांगली असून मृत्यू दर देखील कमी आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या देखील इतर देशाच्या तुलनेत कमी असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – देशात कोरोना रुग्ण होत आहेत झपाट्याने बरे; रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण ४१.६१ टक्के