देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या जनतेला संबोधित करणार आहेत. द्रौपदी मुर्मू या राजधानी दिल्लीतून संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती म्हणून मुर्मू यांचे देशाला केलेले हे पहिलेच संबोधन असणार आहे. राजधानी दिल्लीतून रविवारी संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण सुरू होणार आहे.
द्रौपदी मुर्मू 25 जुलै रोजी भारताच्या 15 व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्या आदिवासी समाजातून येणाऱ्या प्रथम महिला राष्ट्रपती आहेत. विशेष म्हणजे द्रौपदी मुर्मू या देशातील सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या सर्वात तरुण महिला आहे. त्यामुळे आज राष्ट्रपती काय बोलणार? याकडे अवघ्या देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रपतींचे भाषण प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजी भाषेत प्रसारीत केले जाणार आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून हे भाषण दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर आणि आकाशवाणीच्या (AIR) संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर प्रसारित केले जाणार आहे.
दूरदर्शनवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये संबोधन प्रसारित केल्यानंतर दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये देखील प्रसारित केले जाणार आहे. राष्ट्रपतींचे प्रादेशिक भाषांमधील भाषण रात्री 9.30 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या संबंधित प्रादेशिक नेटवर्कवर प्रसारित केले जाणार आहे.
राष्ट्रपतींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत लोक उत्साहाने सहभागी होत आहेत. पंतप्रधान मोदींनी गेल्या महिन्यात “हर घर तिरंगा” मोहीम सुरू केली होती. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि आझादीचा अमृत महोत्सव ‘जन भागीदारी’ या भावनेने साजरा करणे हा या उपक्रमामागील संकल्पना आहे.
हेही वाचा – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : वसई-विरारमध्ये तिरंगा रॅली, अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग