मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा जात आरक्षण प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाचा मी आदर करते. पण न्यायालयाचा अचानकपणे असा निकाल येणे म्हणजे नक्कीच काही तरी कुठेतरी राजकीय खिचडी शिजलेली असल्याचा संशय खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे. माझा कोणावरही आरोप नाही. पण ज्या पद्धतीने न्यायालयाचा अचानकपणे निकाल येतो त्यानुसार काही तरी नक्कीच पडद्याआड शिजलय याबाबतची शंका घ्यायला वाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. शिवसेनेसोबत गेल्या ८ ते ९ वर्षांपासून माझी लढाई सुरू आहे. यापुढच्या काळातही ही लढाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढच्या काळात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी माझे २०१२-१२ मध्ये लग्न झाल्यापासून गेल्या ९ वर्षांपासून शिवसेनेविरोधात लढा देत आहे. या लढाईमध्ये मी महिला असल्याने यापुढच्या काळातही माझे युद्ध संपलेले नाही. त्यामुळेच मी या संपुर्ण जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या विषयात सर्वोच्च न्यायालयात लढा देणार आहे. शिवसेनेविरोधता माझा लढा मी कायम ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पण अचानकपणे कोर्टाचा निकाल येणे यामागे अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या असल्याचे त्या म्हणाल्या.
लेकराचा हक्क पुरवण्यासाठी आई बाप रडत नाहीत
मुख्यमंत्री जर सक्षम असते तर त्यांना केंद्रात यायची गरजच भासली नसती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी हा विषय राज्यातच सोडवला असता. त्यासाठी दिल्लीवारी केली नसती. त्यांना एक संधी हवी होती. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्राचे विषय घेऊन मोदींना भेटण्याची तसदी घेतली. लेकरांच्या मागणीसाठी आई बाप कोणापुढेही रडत नसतात, कोणत्याही पातळीवर जाऊन ते मुलांची मागणी पुर्ण करतात असाही टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. वैयक्तिक भेटीसाठी महाराष्ट्राच्या विषयाची संधी त्यांनी साधल्याचेही नवनीत राणा म्हणाल्या.