कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊनचा आज ४७ वा दिवस आहे. लॉकडाऊनची मर्यादा वाढत चालल्यामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये विखुरलेले स्थलांतरीत मजूर आपापल्या राज्यात पायीच चालत निघाले आहेत. दोन दिवसांपूर्वची औरंगाबाद येथे पायी गावाला जाणाऱ्या १६ मजुरांचा मालगाडीखाली येऊन मृत्यू झाला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतःच रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. आज त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्झी यांच्याशी देखील चर्चा करुन त्या राज्यांनी कामगारांना प्रवेश देण्याची विनंती केली. पवार यांच्या चर्चेनंतर लवकरच राज्यातून आता आणखी काही ट्रेन उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये जाणार असल्याचे राष्ट्रवादीतील एका नेत्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले.
Had a telephonic conversation with Shri @OfficeofUT – Chief Minister of Maharashtra and Shri @PiyushGoyal – the Union Railway Minister regarding the issue of migrant workers.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 9, 2020
महाराष्ट्र राज्यातून आतापर्यंत २५ रेल्वेमधून अनेक कामगार स्वगृही परतले आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल राज्यात आतापर्यंत ट्रेन जाऊ शकली नव्हती. मात्र पवारांनी ममता बॅनर्जी यांच्याशीही संवाद साधून ट्रेन सोडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने सुरुवातील परवानगी दिल्यानंतर पुन्हा निर्णय बदलले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुरुवातीला मजूरांना राज्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र आता पवारांनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला देखील सुरुवात केली आहे. तसेच पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील ट्विटरवरच्या माध्यमातून सर्व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातील कामगार परत घ्यावेत, अशी सूचना केली होती.
I humbly request our @PMOIndia Shri. Narendra Modi ji to intervene in this matter by talking to the CMs of the respective states who are not allowing these people to come back home.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 9, 2020
सर्वाधिक मजूर महाराष्ट्रात
महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतरीत मजूरांची संख्या आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १० लाख स्थलांतरीत मजूर आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटका, ओडिशा आणि तामिळनाडू या राज्यातील मजूरांची संख्या अधिक आहे.