भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष पसरवतेय आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत, पंतप्रधानांकडे परदेशात जायला वेळ आहे, पश्चिम बंगालला जाण्यासाठी सवड आहे. मात्र, २० किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शेतकर्यांची भेट घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. रविवारी रांची येथील हरमू मैदानात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचे विष पसरवत आहे. शेतकरी १०० दिवसांपासून आंदोलन करीत आहेत, पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. मात्र, दिल्लीतील शेतकर्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही.
बिरसा मुंडा यांच्या पवित्र भूमीत आलो, हे आपले भाग्य आहे. क्रिकेट मोठ्या उंचीवर नेण्याचे श्रेय धोनीचे आहे. राहुल द्रविड हा कर्णधारपद सोडण्यासाठी आला असताना आपण सचिन तेंडुलकरला कर्णधारपद घेण्यास सुचवले. पण सचिन तेंडुलकरने धोनीचे नाव सुचवले. धोनीच्या भूमीत आल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे शरद पवार म्हणाले.
युरोपात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर देशातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा संकटावेळी सरकारची जबाबदारी मोठी असते, असे पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासात झारखंड, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या नागरिकांचे योगदान आहे, असे पवारांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना थाळी वाजवण्यास सांगितले. नागरिकांना जागरुक करण्याचे आवाहन केले; पण आम्ही थाळी वाजवणारे नाही. त्या ताटात जेवण कसे मिळेल, याची चिंता करणारे आहोत, असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला. पश्चिम बंगालमध्ये एक महिला मुख्यमंत्री आहे; पण त्यांच्याविरोधात केंद्रीय संस्थांचा वापर केला जात आहे. त्यांच्या हातात सत्ता येऊ नये, हे आपण बघितले पाहिजे, असे पवार म्हणाले.