‘राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे ‘पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं’, असला प्रकार आहे. केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करू नये, आता पथक नको मदत पाठवा’, असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्यात अतिवृष्टी येऊन आता दोन महिने उलटून गेले. दोन महिन्यानंतर केंद्राचे पथक पाहणीसाठी येत आहेत, यावरुन रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे…
‘पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं’, असला प्रकार आहे.
केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करू नये!
आता पथक नको मदत पाठवा!@PMOIndia— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 21, 2020
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसात शेतीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही २३ ऑक्टोबरला जनतेशी संवाद साधताना सांगितले होते की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे राज्यातील ४१ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकासान झाले असून आम्ही केंद्राला तीनवेळा विनंती केली होती. मात्र, त्या दरम्यान केंद्र सरकारचे पथक दाखल झाले नाही. मात्र, आता केंद्र सरकारचे पथक राज्यात दाखल झाले आहे. पुढील पाच दिवस हे पथक राज्यात असणार आहे. केंद्र सरकारच्या याच गोष्टीमुळे रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
आता पाहणी करुन फायदा नाही
केंद्राच्या पथकाने आता पहाणी करुन काहीही फायदा नाही. दोन महिन्यांपूर्वी जो कापूस खराब झाला होता तो आता भुईसपाट झाला आहे. बाजरीचं काढून आता लोकांनी गहू पेरला आहे. त्यामुळे या पथकाला नुकसान कसं दिसणार? असा प्रश्न औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी विचारला आहे. दरम्यान आजच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही केंद्र सरकारच्या पथकावर टीका केली आहे.
हेही वाचा – कर्फ्यू दरम्यान नागरिकांना एकत्र येण्यास बंदी – आयुक्त