मुंबई : लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्याअनुषंगाने सर्वच पक्षांची तयारी सुरू झाली आहे. उमेदवार निश्चिती, जागावाटपाच्या चर्चा यावर सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा, बैठका होत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपाला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. केंद्रात सत्तेत असलेला भाजपा वेगवेगळ्या राज्यांमधील विरोधी पक्षांच्या सरकारांना पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत भाजपाचे कान टोचले आहेत.
हेही वाचा – Drug case : …पण देश सध्या एका वेगळ्याच नशेत आहे, जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा
आव्हाड यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लोकसभेत केलेल्या भाषणातली ही एक क्लिप आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात घडलेला एक प्रसंग लोकसभेत सांगितला आहे.
काय म्हणाले होते अटल बिहारी वाजपेयी?
अटल बिहारी वाजपेयींनी त्यांच्या लोकसभेतील एका भाषणादरम्यान नरसिंह राव यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना दिलेल्या सन्मानाचा संदर्भ दिला होता. जिनिव्हा परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नरसिंह राव यांनी पंतप्रधान असताना तत्कालीन लोकसभा विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांना पाठवलं होतं. त्याचा संदर्भ देत अटल बिहारी वाजपेयींनी हीच आपल्या देशाची परंपरा असल्याचे सांगितले होते. देशाची हीच परंपरा कायम राहायला हवी, असं आवाहनही केलं होतं.
हेही वाचा – Budget Session : सलग चौथ्या दिवशीही विरोधकांचे सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन
“मी विरोधी पक्षनेता असूनही तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी जिनिव्हामध्ये भारताची बाजू मांडण्यासाठी मला पाठवलं होतं. आणि मला बघून पाकिस्तानी आश्चर्यचकित झाले. कारण त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता अशा राष्ट्रीय कार्यामध्ये सहकार्य देण्यासाठी तयार नसतो. त्यांचा हेतू नेहमीच आपल्या सरकारची निंदानालस्ती करण्याचा असतो. ही आपली परंपरा नाही. ही आपली प्रकृती नाही”, असं अटल बिहारी वाजपेयी लोकसभेत म्हणाले होते. ही परंपरा कायम राहायला हवी. सत्तेचा खेळ सुरूच राहील. सरकारं येत राहतील – जात राहतील. नवीन पक्ष तयार होतील, काही फुटतील. पण हा देश जिवंत राहायला हवा, या देशातली लोकशाही जिवंत राहायला हवी”, असं आवाहन अटल बिहारी वाजपेयी यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
येही सच है ! pic.twitter.com/GZ6ULQWQYM
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 29, 2024
जितेंद्र आव्हाडांनी या व्हिडीओसह तीन शब्दांत पोस्ट केली असून त्यात “यही सच है”, अशी टिप्पणी केली आहे.