गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकारण ढवळून निघालं असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली. तब्बल एक तास या दोन्ही दिग्गजांमध्ये चर्चा झाली. पण ती कशाबाबत झाली हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.
Nationalist Congress Party leader Sharad Pawar calls on Prime Minister Narendra Modi in Delhi pic.twitter.com/NuDCpGQSn8
— ANI (@ANI) July 17, 2021
राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याच्या चर्चा सध्या गरम आहेत. त्यातच शिवसेना नेत्यांच्या मागे ईडी हात धुऊन लागली आहे. यामुळे शिवसेनेचे नेतेही अस्वस्थ आहेत. त्यातच भाजप नेत्यांकडून ईडीच्या रडारावर आता पुढचा नेता कोण असेल याची भविष्यवाणी केली जात आहे. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणाणले आहे. तर दुसऱीकडे सत्ताधारी नेत्यांच्या विरोधी नेत्यांबरोबरच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. यामुळे सध्या राज्यात नक्की चाललयं काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
त्यातच आता शरद पवार यांनी थेट मोदींची भेट घेतल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या दोघांची भेट पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली. पण त्याआधी शरद पवार यांची पियुष गोयल यांच्यासोबत भेट झाली. यामुळे या भेटीमागे नक्कीच मोठं कारण दडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.