नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या (New Parliament building) उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार घमासान सुरू आहे. रविवारी (28 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते संसद भवनाच्या नव्या वास्तूचे लोकर्पण होणार आहे. अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी या संसद भवनाचे उद्घाटन करावे, असे विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे आहे. त्यावर देशातील 250हून अधिक प्रतिष्ठित लोकांनी (eminent personalities) या विरोधकांचा निषेध केला आहे.
270 eminent citizens, consisting of 88 Retiree Bureaucrats including 10 Ambassadors, 100 Armed forces veterans and 82 Academicians write an open letter condemning the behaviour of opposition parties indulging in boycott of parliament building inauguration. Inauguration of new… pic.twitter.com/nODW6ZyF8b
— Prof Dr.Ashish Gupta (@ashishbadshah) May 26, 2023
संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांचा देशातील 270 नागरिकांनी निषेध केला आहे. यामध्ये 88 निवृत्त नोकरशहा, 100 प्रतिष्ठित नागरिक आणि 82 शिक्षणतज्ज्ञांचा समावेश आहे. या लोकांनी संयुक्त निवेदन जारी करून विरोधकांवर टीका केली आहे. यामध्ये राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) माजी संचालक वाय. सी. मोदी, माजी आयएएस अधिकारी आर. डी. कपूर, गोपाल कृष्ण आणि समीरेंद्र चॅटर्जी यांच्याशिवाय लिंगया विद्यापीठाचे कुलगुरू अनिल रॉय दुबे यांचा समावेश आहे.
नवीन संसद भवन भारतीयांसाठी अभिमानास्पद
नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा हा समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. मात्र विरोधी पक्ष या निमित्ताने राजकारण करत आहे. त्यांचे पोकळ दावे आणि निराधार युक्तिवाद समजण्याच्या पलीकडे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या संसंद भवनाचे उद्घाटन करणार आहेत आणि तेच कारण पुढे करत सोहळ्यावर बहिष्कार टाकणारे हे विरोधक उघडपणे लोकशाहीच्या भावनांना धक्का लावत आहेत, असे या मान्यवरांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा – लोकार्पणास विरोध करणाऱ्या विघ्नसंतोषींना जनता धडा शिकवेल; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
राष्ट्रपतींचा वारंवार अपमान
काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता, अशा काही प्रसंगांचाही उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे. 2017, 2020, 2021 आणि 2022 या वर्षांतही विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकला होता, असे या मान्यवरांनी म्हटले आहे. आज विरोधी पक्ष राष्ट्रपतींची बाजू घेऊन बोलत आहे, पण काँग्रेसच्या नेत्याने त्यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला तेव्हा, द्रौपदी मुर्मू यांच्या आदरासाठी हे विरोधक का उभे राहिले नाहीत? असा सवालही या मान्यवरांनी केला आहे. फलक दाखवून कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याची भूमिका विरोधकांनी अद्याप सोडलेली नाही. अनेकवेळा या पक्षांनी लोकशाही व्यवस्थेचा अशा प्रकारे अपमान केला आहे, असा थेट आरोप या 270 मान्यवरांनी केला आहे.