नवी दिल्ली : देशभरात १९५० व १९६० च्या दशकात डिझाईन केलेल्या सर्व ट्रेन बदलण्यात येणार आहेत. त्या जागी नवीन ट्रेन येणार आहेत. नवीन सर्व ट्रेन हायड्रोजन पाॅवरवर धावणाऱ्या असतील, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
ते म्हणाले, हायड्रोजनवर धावणारी वंदे मेट्रो ही पहिली ट्रेन असणार आहे. तिचं डिझाईन बनवण्याचे काम सुरु आहे. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत त्याचं डिझाईन बनवून पूर्ण होईल व डिसेंबरमध्ये ती सेवेत दाखल होईल. ही देशातील पहिली स्वदेशी ट्रेन ठरणार आहे. जागतिकस्तरावरचे त्याचे डिझाईन तयार केले जाणार आहे.
पुढे ते म्हणाले, या ट्रेनचे डिझाईन गरीबांची काळजी घेणारे असेल. आमचं टार्गेट श्रीमंत प्रवासी नाहीत. श्रीमंत आपली व्यवस्था करु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू गरीबांपर्यंत योजना व सुविधा पोहोचवण्याचा आहे. त्यानुसार या ट्रेनची निर्मिती केली जाणार आहे.
मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवत असते. गरीबांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवले जातात. त्यानुसार रेल्वेचाही कायापालट केंद्र सरकारने सुरु केला आहे. रेल्वेचे खाजगीकरण सुरु केले आहे. काही मार्गांवर खाजगी रेल्वे चालवल्या जात आहेत. एसी लोकलचा पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. काही रेल्वे स्थानकांच्या खाजगी करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. आता तर जुन्या रेल्वे हद्दपार करुन नवीन रेल्वे आणल्या जाणार आहेत. मात्र या रेल्वेचा प्रवास खरचं सर्वसामान्यांना परवडणारा असेल का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तसेच रेल्वेचा कायापालट करण्याचा मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम आहे. मात्र अद्यापही रेल्वे अपघात रोखण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. रेल्वे अपघात रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. जनजागृती केली जाते. तरीही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे रेल्वेचे नवीन डिझाईन करताना अन्य सोयीसुविधा व अपघात रोखण्याकडेही सरकारने लक्ष द्यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.