देशात कोरोना रुग्णंसख्येत सतत वाढ होत असून दररोज लाखोच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येवर केंद्र सरकारने चिंता व्यक्त करत पुढील चार आठवडे देशासाठी महत्वाचे असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांना अधिकाधिक जागरुक राहण्याचे आवाहन केंद्र सरकराने केले आहे. याबाबत निती आयोगाचे सदस्य आणि कोरोनाविरोधी कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांच्यासह केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषणही उपस्थित होते.
यावेळी नागरिकांना इशारा देत प्रा. पॉल म्हणाले, भारतात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी सर्व गोष्टी गृहित धरुन चालणार नाहीत. कोरोना महामारीची परिस्थिती सध्या बिकट बनत असून मागील वेळेपेक्षा संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे देशासाठी पुढील चार आठवडे अधिक चिंतेचे असतील, त्यामुळे पात्र नागरिकांनी नि:संशयपणे लस घ्यावी, कारण भारतात उपलब्ध असलेली लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच नागरिकांनी कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
यावर बोलताना पॉल म्हणाले, देशात कोरोना रुग्ण सतत वाढत असल्याने कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. यासाठी अधिकाधिक नागरिकांना चाचण्यांवर आणि लसीकरणावर भर द्या. तसेच मास्क वापरणे व इतर नियमांचे पालन करण्यावर बंधनकारक करण्यावर राज्यांनी भर द्यावा.
यावर बोलताना भूषण म्हणाले, छत्तीसगडसारख्या छोट्या राज्यातही वाढणारी रुग्ण संख्या काळजीत टाकणारी आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या तुलनेत ६ टक्के रुग्ण एकट्या छत्तीसगड राज्य़ात आहे. त्यामुळे छत्तीसगडमधील कोरोनास्थिती अधिक बिकट झाली आहे. यातदेशातील एकूण रुग्णसंख्येतील ५८ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहे, तर मृत्यूदर ३४ टक्के इतका आहे. त्यामुळे एकूण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र रुग्णसंख्येत आघाडीवर आहे. महाराष्ट्रपाठोपाठ दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक राज्यांचाही समावेश आहे. यात मृत्यूदराचे सर्वाधिक प्रमाण छत्तीसगडमध्ये असल्याचेही भूषण यांनी स्पष्ट केले.