भारतात यंदा 75 डिजीटल बँका सुरु करण्याची योजना आखण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, बँकिंग व्यतिरिक्त नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी स्थापन करण्याची देखील योजना आहे. वॉशिंग्टन डीसी येथील थिंक टँक अटलांटिक कौन्सिलला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
75 जिल्ह्यांमध्ये सुरु होणार डिजीटल बँका
याआधीही केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँका सुरु करण्याबाबत सांगितले होते. सीतारामन म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या आधी भारताने डिजिटायझेशन वेगाने वाढवले यामुळे केंद्र आर्थिक समावेशाचा कार्यक्रम घेऊन आले, जो याआधी जगात कुठेही दिसला नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणार विशिष्ट ओळख
भारताचे तीन मोठे पब्लिक डिजीटल प्लॅटफॉर्म असलेले आधार, UPI आणि Covin जगासमोर आले. त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली. विशेष म्हणजे, आधार ही सर्वात मोठे विशिष्ट डिजिटल ओळख असलेले प्लॅटफॉर्म असले तरी UPI हे सर्वात मोठे डिजिटल पेमेंट अॅप आहे. तर कोविनच्या (Covin) माध्यमातून देशात 150 कोटींहून अधिक लसीकरण करण्यात आले आहे. यावर सीतारामन म्हणाल्या की, डिजिटल प्रोग्राममुळे प्रत्येक विभागातील लोकांचे जीवन खूप सोपे झाले आहे.
श्रीलंकेला मदतीचा विश्वास
यापूर्वी अमेरिकेत झालेल्या IMF स्प्रिंग मीटमध्ये (IMF Spring Meet) अर्थमंत्र्यांनी श्रीलंकेचे समकक्ष अली साबरी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी साबरी यांना आश्वासन दिले की, एक जवळचा मित्र आणि चांगला शेजारी म्हणून भारत श्रीलंकेला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल.