पासपोर्ट पडताळणीसंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबईकरांना यापुढे पोलीस स्टेनशमध्ये जाण्याची गरज भासरणार नाही. कारण यापुढे स्थानिक पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अर्जदाराच्या घरी येऊन स्वत: पासपोर्टची पडताळणी करणार आहेत. अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. परंतु पासपोर्टसाठी लागणारी कागदपत्रं अपूर्ण असल्यास मात्र अर्जदारांना पोलीस ठाण्यात हजर रहावं लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. पासपोर्टच्या पडताळणीसाठी स्थानिक पोलीस ठाण्यातून कॉन्स्टेबल अर्जदाराच्या घरी येणार आहे. मात्र एखाद्या पोलीस ठाण्याकडून या नियमांचे पालन होत नसल्यास त्याबाबत तक्रार करण्याचे आवाहन आयुक्त पांडे यांनी केलं आहे.
#PassportVerification. We have decided no citizen will be called to police station in Mumbai except in exceptional cases of documents being incomplete etc. If not followed do report🙏
— Sanjay Pandey (@sanjayp_1) March 12, 2022
पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या पासपोर्ट पडताळणीसंदर्भातील निर्णयाचे आता मुंबईकरांकडून स्वागत केले जातेय. कारण पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठीची प्रक्रिया खूप वेळ खाऊन मानली जाते. अर्जदारांना अनेकदा व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशनमध्ये रांग लावावी लागते. ज्यात अनेकदा भ्रष्टाचार आणि लाचखोरी झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहे. याच सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आयुक्तांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबई पोलीस आयुक्त पदाची धुरा हाती घेतल्यानंतर संजय पांडे यांनी मुंबईकरांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई, नो पार्किंगमधील वाहने क्रेनद्वारे न उचलवण्याचा निर्णय, पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांसाठी आठ तास ड्यूटी, रात्रीच्या कन्स्ट्रक्शन कामांच्या त्रासाने बिल्डर प्रतिनिधींना ध्वनीप्रदुषण आणि इतर नियमांचे पालन करण्याचा सल्ला असे अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतली. दरम्यान, संजय पांडे यांच्या निर्णयांचं सोशल मीडियावरून स्वागत करण्यात येत आहे. संजय पांडे यांनी सोशल मीडियावरुनही वारंवार मुंबईकरांशी तसेच पोलीस दलातील कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे.