सध्या देशभर लॉकडाऊन सुरु असून यात रेल्वे सेवाही बंद आहे. मात्र १४ एप्रिलला लॉकडाऊनचा कालावधी संपल्यावर रेल्वे सेवा पुन्हा सुरु होईल, अशा बातम्या दोन दिवसापासून येत आहेत. त्याचे रेल्वे प्रशासनाने आता खंडन करत १५ एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरू करण्याचे कोणतेही नियोजन नाही, असे स्पष्ट केले आहे. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठीच रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेव्हा रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल तेव्हा त्याविषयी नागरिकांना अवगत करण्यात येईल. ‘भारतीय रेल्वेने १५ एप्रिलपासून पुन्हा रेल्वे सेवा सुरू करण्याची योजना तयार केली आहे. रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाश्यांची थर्मल स्क्रीनिंग होईल, प्रवाशांना रेल्वे धावण्यापूर्वी ४ तास आधी स्टेशनवर यावे लागेल’, अशा आशयाची वृत्ते प्रसारित झाली होती. त्यामुळे
प्रवाशांकडून ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर विचारणा होऊ लागली होती.
कोरोना विषाणूच्या संसर्गाला सामोरे जाण्यासाठी भारतीय रेल्वेने २४ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान प्रवासी, मेल आणि एक्सप्रेस ट्रेन सेवा चालवणे थांबवले आहेत. देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष मालवाहतूक आणि विशेष पार्सल गाड्या कार्यरत आहेत. रेल्वेने सर्व आवश्यक वस्तू जलदगतीने वितरीत करण्यासाठी विशेष पार्सल गाड्यांसाठीदेखील वेळापत्रक तयार केले आहे.
दरम्यान, रेल्वेसेवा आणि वाहतुकीची इतर सेवा बंद असताना एसटीने जीवनावश्यक सेवांसाठी प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष सेवा सुरूच ठेवली आहे. त्यासाठी राज्यभरातल्या निवडक एसटीच्या कर्मचाऱ्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आलं असून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.