कोरोना रुग्णसंख्या (Coronavirus) आटोक्यात आणण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेवर अधिक भर दिला जात आहे. दरम्यान अनेक राज्यांत लसीच्या (Corona Vaccination) साठ्यामध्ये वाढ केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लसींचा साठा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांची लसीकरणाची चिंता मिटली आहे. सकारच्या आकडेवारीनुसार, विविध राज्यांमध्ये अद्याप न वापरलेल्या लसींची संख्या मागील एका महिन्यात दुप्पट झाली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही संख्या ५ कोटीच्या घरात होती. आत्ता हीच संख्या १० कोटीच्या घरात आहे. यावरून देशात कोरोनाविरोधी लसींचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, रविवारपर्यंत लसीकरण मोहिमेंतर्गत राज्यांकडे दहा कोटीहून अधिक लसीचे डोस पडून होते. राज्यांकडे लसीकरणासाठी पुरेशे डोस आहेत. दरम्यान आकडेवारीनुसार, एक आठवड्यापूर्वी सुमारे ८ कोटी डोस उपलब्ध होते. तर या महिन्याच्या सुरुवातीला ही संख्या जवळपास पाच कोटी इतकी होती. त्यामुळे दैनंदिन लसीकरणाच्या तुलनेत लसींचा साठा भरपूर वाढला आहे. लसींच्या वाढत्या साठ्यामुळे एका दिवसात अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यास मदत होत आहे.
लसींच्या वाढत्या साठ्यामागचे कारण देशात लसींचे वाढते उत्पादन आणि उत्तम रसद व्यवस्था म्हटले जात आहे. राज्यांकडे आत्ता सुमारे २२.२ कोटी कोव्हिशील्ड लसींचे डोस आणि कोवॅक्सिनचे ६० लाख डोस शिल्लक आहे. रविवारपर्यंतच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे १०० कोटी नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत ९७. ६५ कोटी डोस देण्यात आले आहेत.