मुंबई : काँग्रेस पक्ष संपला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, पण गेल्या नऊ वर्षांत असा एकही दिवस गेला नाही की, मोदींनी काँग्रेसचा जप केला नाही. ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही अलोकशाहीवादी गर्जना त्यांनी केली, पण त्यांना काँग्रेसला संपवता आले नाही, असे शरसंधान ठाकरे गटाने केले आहे.
हेही वाचा – मोदी-शहांच्या भाजपाचे राजकारण ‘या’ चतुःसूत्रीवर आधारित, ठाकरे गटाचे जोरदार टीकास्त्र
काँग्रेस पक्ष हा गंज आलेल्या लोखंडासारखा असून त्याचा ताबा आता ‘शहरी नक्षलवाद्यां’कडे आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. मोदी यांचे म्हणणे आहे की, ‘‘सर्वात आधी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष संपला आणि त्यानंतर दिवाळखोरीत निघाला. आता हा पक्ष भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला गेला असून त्याचे कंत्राट शहरी नक्षलवाद्यांना मिळाले आहे.’’ मोदी यांचे हे विधान राजकीय संस्कृती व सभ्यतेस धरून नाही, अशी टीका सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.
मोदी यांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस अशा अनेक पक्षांना संपवायचे आहे, पण त्यांना लडाखमध्ये घुसलेल्या चीनला संपवायचे नाही. त्यांना महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार संपवायचे नाहीत. त्यांना काँग्रेसला संपवायचे आहे, पण मोदी व त्यांच्या लोकांना काँग्रेस, शिवसेना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला संपवता आले नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
हेही वाचा – “परदेशात जाण्यापेक्षा दुसऱ्या राज्यात गेलेले उद्योग परत आणा”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला
पंतप्रधान सध्या सर्व लवाजमा घेऊन निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांत दौरे करीत आहेत. आपण देशाचे पंतप्रधान आहोत याचे भान न ठेवता ते भाजपाच्या मेळाव्यांतून भाषणे करीत आहेत. खरं म्हणजे, मोदी-शहांच्या वेस्ट इंडिया कंपनीला काहीच संपवता आलेले नाही. ईडी, सीबीआय हाताशी नसेल तर या वेस्ट इंडिया कंपनीच्या मालकांना रस्त्यावर फिरणे कठीण होईल, असे देशाचे वातावरण आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
ईस्ट इंडिया जे कायदे पाळत होती तेवढेही कायदे मोदी-शहांची कंपनी पाळायला तयार नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारला वाचवण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे सरकार बेकायदा ठरवूनही ते सरकार चालू देणे हे गंजलेल्या मेंदूचे व गांजलेल्या विचारांचे लक्षण आहे. काँग्रेस गंजलेले लोखंड असेल तर भाजपा हा ‘गांजलेला’ पक्ष आहे. गंज काढण्याच्या अनेक उपाययोजना आहेत. गांजलेल्यांचे वैफल्य व नैराश्य दूर करणे कठीण असते. काँग्रेसचा गंज उतरू लागला आहे व लोखंडही सोन्यासारखे उजळून निघेल, पण गांजलेल्यांचे काय? असा बोचरा प्रश्न ठाकरे गटाने केला आहे.