घरदेश-विदेशपाकिस्तानसोबतच यंदा चीनही निशाण्यावर…; अजित डोवाल यांनी दोन्ही देशांना घेरलं

पाकिस्तानसोबतच यंदा चीनही निशाण्यावर…; अजित डोवाल यांनी दोन्ही देशांना घेरलं

Subscribe

बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवलेल्या भारताचे NSA अजित डोवाल यांनी पाकिस्तानच्या उपस्थितीत दहशतवादावरील मुद्दा उचलून धरला.

SCO-NSA Meet : भारताच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिल्लीत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (NSAs) बैठक झाली. या बैठकीला पाकिस्तान आणि चीनचे प्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवलेल्या भारताचे NSA अजित डोवाल यांनी पाकिस्तानच्या उपस्थितीत दहशतवादावरील मुद्दा उचलून धरला.

भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर दहशतवाद हे जागतिक शांततेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानासोबत चीनवर निशाणा साधला आणि म्हटले की, दहशतवाद कोणत्याही स्वरूपाचा असो आणि त्याला मिळणारा निधी हा जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोका आहे. दहशतवादासाठी उचललेले कोणतेही पाऊल, त्यामागील हेतू काहीही असो, तो अन्यायकारक आहे. आपल्या भाषणात डोवाल यांनी सदस्य राष्ट्रांच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा परस्पर आदर करण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

एनएसए अजित डोवाल यांनी एससीओच्या बैठकीला संबोधित करताना चीनचे नाव न घेता स्पष्टपणे सांगितले की संघटनेच्या सदस्यांनी प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. तसंच आसपासच्या भागात एकतर्फी लष्करी श्रेष्ठतेच्या कारवाया बंद केल्या पाहिजेत. क्षेत्रीय कनेक्टिविटीच्या मुद्द्यावर भर देताना ते म्हणाले की, असे उपक्रम पारदर्शक असले पाहिजेत. आपण सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला (CPEC) सातत्याने विरोध होत असतानाच त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

हे ही वाचा: मुंबईत दहा वाहनतळांमध्ये लवकरच इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन

- Advertisement -

ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण परिवहन कॉरिडॉर अंतर्गत आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आणि INSTC च्या चौकटीत चाबहार बंदर सहभागी करून घेण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर हा भारत आणि रशियामधील एक कॉरिडॉर आहे, जो इराणमधून जातो. या कॉरिडॉरचा उद्देश भारत आणि रशिया यांच्यातील वाहतुकीचा खर्च कमी करणे हा आहे. ७२०० किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरमध्ये रस्ते, रेल्वे आणि सागरी मार्गांचा समावेश आहे. हा कॉरिडॉर आशिया आणि इराणच्या माध्यमातून भारत आणि रशियाला जोडतो.

हे ही वाचा: आता घरी बसून मतदान करणं आहे शक्य, व्होट फ्रॉम होमची घोषणा…

SCO च्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीनंतर SCO सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. यानंतर ४ ते ५ मे रोजी गोव्यात SCO परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. 2017 मध्ये SCO मध्ये सामील झाल्यानंतर भारत प्रथमच त्याचे आयोजन करत आहे. यापूर्वी वाराणसी येथे झालेल्या एससीओच्या पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीतही पाकिस्तानने भाग घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -