नवी दिल्ली : गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर आज 19 सप्टेंबर रोजी देशाचे संसद भवन अखेर संसद संकुलातील नवीन संसद भवनात स्थलांतरित झाले आहे. आजपासून देशातील खासदार नव्या इमारतीतच बसणार आहेत. पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न फिरत होता की, जुन्या संसद भवनाचे काय होणार? याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित शेवटच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की आता जुनी संसद संविधान संसद म्हणून ओळखली जाईल. तेव्हा जुन्या संसदेला आता आज नवीन ओळख मिळाली आहे. (Old Parliament got a new identity today Read this announcement made by the Prime Minister)
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण जुन्या संसदेला विसरणार नाही आणि तिची प्रतिष्ठा राखायला हवी, आज दिशा निश्चित केल्याने ही इमारत आता संविधान संसद म्हणून ओळखली जाणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, ही इमारत आणि हा सेंट्रल हॉल आमच्या भावनांनी भरलेला आहे. ही इमारत आपल्याला भावनिक बनवते आणि आपल्या कर्तव्यासाठी प्रेरित करते. पुढे म्हणाले की, 1952 नंतर जगातील सुमारे 41 राष्ट्रप्रमुखांनी आमच्या सर्व सन्माननीय खासदारांना या सेंट्रल हॉलमध्ये संबोधित केले आहे. आमच्या सर्व अध्यक्षांनी 86 वेळा येथे भाषणे दिली आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान, पंतप्रधान म्हणाले, ‘माझी प्रार्थना आणि सूचना आहे की जेव्हा आपण नवीन संसद भवनात जात आहोत, तेव्हा जुन्या संसद भवनाची प्रतिष्ठा कधीही कमी होऊ नये. नुसते त्याला ‘जुने संसद भवन’ म्हणत सोडून देऊ नये असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
तृतीय पंथीयांसाठी तयार केलेल्या कायद्यांचाही केला उल्लेख
ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत संसदेने तृतीयपंथीना न्याय देणारे कायदेही केले आहेत. याद्वारे आम्ही तृतीयपंथीना सौहार्द आणि आदराने नोकऱ्या, शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधा देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. याशिवाय, आज जम्मू-काश्मीरने शांतता आणि विकासाच्या मार्गावर सुरुवात केली आहे आणि नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने आणि नव्या निर्धाराने तिथले लोक पुढे जाण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत असेही ते म्हणाले.
राजकीय लाभ आणि तोट्याच्या गुणाकारात बंदिस्त ठेवू शकत नाही
हेही वाचा : सगळी संकटे दूर कर…मुख्यमंत्री शिंदेंचं गणराया चरणी साकडं
पुढे ते म्हणाले की, आता आपल्याला उत्पादन क्षेत्रात जगातील सर्वोत्कृष्ट होण्यासाठी काम करायचे आहे. आमची रचना, आमचे सॉफ्टवेअर, आमची कृषी उत्पादने, आमची हस्तकला, आता प्रत्येक क्षेत्रात जागतिक मानकांना मागे टाकण्याच्या इराद्याने आम्हाला पुढे जायचे आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन पुढे जायचे आहे. तसेच भविष्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. राजकीय लाभ आणि तोट्याच्या गुणाकारात आपण स्वतःला बंदिस्त ठेवू शकत नाही. देशाच्या आशा-आकांक्षांसाठी धैर्याने नवे निर्णय घ्यावे लागतील असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा तापला; कॅनडाने केले भारतावर गंभीर आरोप
सामाजिक न्यायाकडे सर्वसमावेशकपणे पहावे
पुढे ते म्हणाले की, सामाजिक न्याय ही आपली पहिली अट असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सामाजिक न्यायाशिवाय, समतोलाशिवाय, समानतेशिवाय आपण परिणाम साध्य करू शकत नाही. पण सामाजिक न्यायाची चर्चा फारच मर्यादित राहिली आहे. त्याकडे सर्वसमावेशकपणे पाहावे लागेल. ते म्हणाले की, देशाचा पूर्वेकडील भाग हा समृद्धीने भरलेला आहे, मात्र तेथील तरुणांना रोजगारासाठी इतर भागात जावे लागते. आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे आणि देशाचा पूर्व भाग समृद्ध करून सामाजिक न्याय बळकट करायचा आहे. असेही ते यावेळी म्हणाले.