दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने काही देशांमध्ये भयानक रुप धारण केले आहे. ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशात ओमिक्रॉनचा कहर सुरू आहे. यादरम्यान ओमिक्रॉनबाबत सर्वात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टर कोएत्जी यांनी इशारा दिला होता. आता डॉ. कोएत्जी यांनी लसीकरणाचे महत्त्व सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, ‘आतापर्यंत ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही, खासकरून त्यांना ओमिक्रॉनचा अधिक धोका होऊ शकतो.’
डॉ. कोएत्जी पुढे म्हणाल्या की, ‘लसीकरण झालेल्या लोकांवर ओमिक्रॉनचा जास्त परिणाम होत नसल्याचे दिसून येत नाही. लोक ओमिक्रॉनमुळे संक्रमित होत आहेत, परंतु लसीकरणामुळे त्यांना आरोग्यासंबंधीत फारशा समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. पण आतापर्यंत ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नाही, त्यांच्यासाठी हा व्हेरिएंट तणावपूर्ण असल्याचे सिद्ध होऊ शकते.’
काल, सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील १२ राज्यांमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे १६१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक ५४ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत, तर दिल्लीत ३२ आणि तेलंगणामध्ये २० जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. यातील ४२ रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात करण्यात यश मिळवले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच काही अशा केसेस आहेत, ज्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार आहेत. डॉ. कोएत्जी म्हणल्या की, ‘ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या धोक्याबाबत इतर डॉक्टर काय म्हणतात, हे मला माहिती नाही. मी स्वतः अजून ओमिक्रॉनच्या गंभीर केसेस पाहिल्या नाहीत. पण ज्यांचे अजून लसीकरण झाले नाही, त्यांच्यावर ओमिक्रॉनचा प्रभाव अधिक होऊ शकतो.’
हेही वाचा – देशात आता नाकाद्वारे दिली जाणार कोरोनाची लस?