मुंबई : दिवाळीचा आनंद एकतर्फी नसावा. दिवाळीच्या उत्साहात सगळ्यांनीच सामील व्हावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लष्करी रंगभूषेत सैन्यतळावर जातात, तसे एका दिवाळीत त्यांनी खऱ्याखुऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर जावे व कृषीप्रधान भारताच्या राष्ट्रनिर्मात्याची दुःखद कहाणी समजून घ्यावी, असा सल्ला ठाकरे गटाने पंतप्रधान मोदी यांन दिला आहे.
मंगलमय, चैतन्यदायी अशा या दीपोत्सवात सगळ्यांनीच सहभागी व्हायचे आहे व या दिवाळीत लोकांचा मूड दिसतो आहे. आज दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा आहे. राष्ट्रनिर्माणात सैन्याइतकेच ‘बळी’चे म्हणजे शेतकऱ्यांचेही योगदान तितकेच अमूल्य आहे. दिवाळी पाडवा हा काही व्यापारीवर्गाचा उत्सव नाही, याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रेलखाद्वारे लक्ष वेधले आहे.
पंतप्रधानांनी नवे काय सांगितले?
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लष्करी गणवेषात जवानांबरोबर दिवाळी साजरी करताना दिसले. हिमाचल प्रदेशातील लेपचा येथील लष्करी तळावर पंतप्रधान पोहोचले. त्यांनी जवानांसोबत फराळ केला आणि देशाला माहीत नसलेली वेगळीच माहिती दिली. राष्ट्रनिर्माणात सैन्याचे योगदान अमूल्य असल्याची माहिती मोदी यांनी दिली. सैन्य आहे म्हणून आपला देश सुरक्षित आहे हे कुणालाच माहीत नसेल. सैन्यतळावर जाऊन आपल्या पंतप्रधानांनी नवे काय सांगितले? असा खोचक प्रश्न ठाकरे गटाने केला आहे.
बळीराजाला कोणी विसरू नये
दिवाळी पाडव्याचा दिवसदेखील मंगलमय, तितकाच शौर्याची प्रेरणा देणारा आहे. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या आजच्या दिवशी होतो. राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले. त्यांचा पराभव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. या दिवसास साडेतीन मुहूर्ताचे वैभव आहे, पण या वैभवात आमच्या बळीराजाला कोणी विसरू नये, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
शेतकऱ्यांची वेदना मांडली
पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यांचे मुख्यमंत्री ‘पाडव्या’स शुभेच्छा देतात व आपापल्या बंगल्यांच्या आवारात थाटात सण साजरे करतात. बळीराजा मात्र बांधावर विमनस्कपणे बसून नुकसान झालेल्या पिकाकडे पाहत असतो. सीमेवरील सैनिकाला राष्ट्रनिर्माणाचे योगदान म्हणून ‘पगार’, ‘पेन्शन’ मिळते. बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबास पेन्शन मिळते, पण बळीराजा व त्याचे कुटुंब सदैव निराधार म्हणून जगते. बळीराजा व त्यांची पोरे शेवटी कंटाळून आत्महत्या करतात व त्यांच्या कुटुंबास नंतर जे भोग भोगावे लागतात ते भयंकर असतात. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ही वेदना कुणीतरी मांडायला हवीच म्हणून ती मांडली, असे ठाकरे गटाने या अग्रलेखात नमूद केले आहे.
…तरच दिवाळी तेजोमय होईल
‘ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात बळीराजाचा बळी देऊन राज्य चालवले जात आहे. निसर्ग झोडत आहे व राजा मारत आहे. अशा कोंडीत सापडलेला बळीराजा चांगल्या दिवसाच्या प्रतीक्षेत येणारा दिवस ढकलत आहे. असंख्य शेतकऱ्यांच्या घरांत साधी पणतीही पेटलेली नाही. जोपर्यंत बळीराजास सुखाचे दिवस येत नाहीत, तोपर्यंत दिवाळी आणि पाडवा खऱ्या अर्थाने तेजोमय होणार नाही, असे सांगत, 2024ची दिवाळी, पाडवा आजच्यापेक्षा मंगलमय, तेजोमय, जवानांबरोबर किसानांच्याही भरभराटीचा येवो, अशा शुभेच्छा ठाकरे गटाने दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने दिल्या आहेत.