नवी दिल्ली : ‘नो मनी फॉर टेरर’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जागतिक समुदायाने दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्याचे “स्वरुप- माध्यम – पद्धत” समजून घेतली पाहिजे आणि हे रोखण्यासाठी सर्वांनी ‘एक विचार, एक दृष्टीकोन’ या तत्त्वाचा अवलंब केला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केले.
‘दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा आणि दहशतवादाचा जागतिक कल’ या विषयावरील नवी दिल्लीत आयोजित तिसऱ्या ‘नो मनी फॉर टेरर’ मंत्रिस्तरीय परिषदेच्या पहिल्या सत्राचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अध्यक्षपद भूषवले. दहशतवाद हा निःसंशयपणे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोका आहे, परंतु, दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा हा दहशतवादापेक्षाही अधिक धोकादायक आहे, दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्यामुळे जगातील देशांची अर्थव्यवस्था कमकुवत होते, असे अमित शाह म्हणाले.
To achieve the goal of "No Money for Terror", the global community must understand the "Mode – Medium – Method" of Terror Financing and adopt the principle of 'One Mind, One Approach' in cracking down on them.#NMFT2022 pic.twitter.com/xUIqXOQ0ER
— Amit Shah (@AmitShah) November 18, 2022
सीमेपलीकडून पुरस्कृत होणाऱ्या दहशतवादाचा भारत अनेक दशकांपासून बळी ठरला आहे, सांगून ते म्हणाले, काही देश दहशतवाद्यांना संरक्षण आणि आश्रय देतात हे आपण पाहिले आहे. हे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. अशा प्रवृत्ती कधीही त्यांच्या हेतूमधे यशस्वी होऊ नयेत ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
ऑगस्ट 2021नंतर दक्षिण आशियायी प्रदेशातील परिस्थिती बदलली आहे. सत्ताबदल आणि अल्- कायदा तसेच इसिसचा वाढता प्रभाव हे प्रादेशिक सुरक्षेसाठी एक मोठे आव्हान म्हणून उभे ठाकले आहे. या नव्या समीकरणांमुळे दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्याची समस्या अधिक गंभीर झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. अल्-कायदासोबतच दक्षिण आशियातील लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटना दहशत पसरवत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्याची समस्या व्यापक बनली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत भारताने दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखण्यात यश मिळवले आहे. आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच भारतात दहशतवादी घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे, परिणामी दहशतवादामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानातही मोठी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय समन्वय आणि पारदर्शक सहकार्य हे दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वात प्रभावी धोरण आहे, असा भारताचा विश्वास असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.