संपूर्ण जग आणि देश २०२० वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठीच्या तयारीत लागले होते, तेव्हा १९ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३५ कोटी देशवासियांना एक आवाहन केले. कोरोनासोबत लढण्यासाठी भारत किती सज्ज आहे हे पाहण्यासाठी २२ मार्चपासून संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू लादून त्याचे पालन करण्याचे आवाहन मोदींनी केले होते. मोदींच्या या आवाहनामुळे पहिल्यांदात संपूर्ण देशात, राज्यात, गावागावात शुकशुकाट पसरला होता. आज या जनता कर्फ्यूला १ वर्ष पूर्ण झाले आहे.
गेल्या वर्षी ३० जानेवारीला भारतात कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण समोर आले. त्यावेळेस कोणालाच ठाऊक नव्हते हा कोरोनाचा धोका किती घातक आहे? आणि याचा प्रसार कधीपर्यंत असेल? जेव्हा या कोरोनाने रौद्र रुप धारण केले, तेव्हा मार्चमध्ये केंद्र सरकार कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली. सर्वात पहिल्यांदा २२ मार्च २०२० पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती.
देशभरात हा जनता कर्फ्यू सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत होता. सर्वांना यादरम्यान घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. दुकानांपासून ते शाळा कॉलेजपर्यंत सर्व काही पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याची मुभा देण्यात आली होती.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
१९ मार्च २०२० रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करण्यासाठी लाईव्ह आले. त्यावेळेस मोदी म्हणाले की, देश कोरोनामुळे गंभीर परिस्थितीतून जात आहे. या संकटापासून आपण अनभिज्ञ राहू नये. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे मला तुमचे पुढील काही आठवडे आणि वेळ हवी आहे, असे म्हणत मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. २२ मार्च २०२० म्हणजे रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. यावेळी ज्यांनी देशवासियांसाठी कर्तव्य बजावले त्यांच्यासाठी सायंकाळी ५ वाजता ५ मिनिटे टाळ्या वाजवून, घंटी वाजवून, थाळ्या वाजवून आभार व्यक्त करण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले होते. स्थानिक प्रशासनाने सायंकाळी ५ वाजता सायरन वाजवावा, असे सांगण्यात आले होते.
हेही वाचा – Coronavirus India Update: देशात २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ!