देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बर्याच राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाच्या वाढत्या बाधितांची संख्या लक्षात घेता चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, त्यांनी संपूर्ण देशात देशव्यापी लॉकडाऊनची मागणी केली आहे. देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग अटोक्यात आणायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असं राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
GOI doesn’t get it.
The only way to stop the spread of Corona now is a full lockdown- with the protection of NYAY for the vulnerable sections.
GOI’s inaction is killing many innocent people.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 4, 2021
असे केले ट्वीट
राहुल गांधी यांनी ट्विट केले की, केंद्र सरकार कोरोना परिस्थिती समजून घेत नाही. कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करणं हाच त्यावर पर्याय आहे. मात्र, लॉकडाऊन करण्यापूर्वी गरीबांना न्याय आणि संरक्षण दिलं पाहिजे. केंद्र सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याने अनेक निष्पाप लोकांना लोकांचा बळी जात आहे. यासह राहुल गांधी यांनी ट्विट करून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात यावं, अशी मागणीही केली आहे.
आतापर्यंत राहुल गांधींनी लॉकडाऊनला आपला विरोधच दर्शविला आहे, गेल्या वर्षीही जेव्हा केंद्र सरकारने पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली तेव्हा राहुल गांधी यांनी टीका केली होती. राहुल गांधी बऱ्याचदा असेही म्हणाले, लॉकडाऊन केवळ कोरोनाची गती थांबवू शकतो, कोरोना पूर्णतः दूर करू शकत नाही. मात्र, यावेळी राहुल गांधी यांनी स्वत: संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ३ लाख ५७ हजार २२९ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ३,४४९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे देशात बाधितांचा एकूण आकडा वाढून २ कोटी २ लाख ८२ हजरांवर पोहोचला आहे तर एकूण २ लाख २२ हजार ४०८ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. देशात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असून दिवसेंदिवस बाधित रूग्णांचा आकडा वाढतांना दिसतोय, देशात सध्या ३४ लाख ४७ हजार १३३ इतके सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे.