देशभरात बैसाखी धूमधड्यात साजरी केली जाते. या दिवस शीख समाजातील लोकं नवे वर्ष म्हणून साजरा करतात. देशात विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. आसाममध्ये या सणाला बिहू, केरळमध्ये पूरम विशू, बंगालमध्ये नबा वर्ष या नावाने ओळखले जाते. शीख समुदायासाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो. हा दिवस नातेवाईकांसोबत मिळून उत्साहात साजरा करतात. यावर्षी १४ एप्रिलला हा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने दोन हजारांहून अधिक भारतीय शीख पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. फाळणीनंतर भारतात गेलेल्या हिंदू मंदिरे, शीख गुरुद्वारा आणि इतर धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनावर देखरेख करणाऱ्या इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ETPB) आणि पाकिस्तान शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांनी वाघा सीमेवर त्यांचे स्वागत केले.
ईटीपीबी प्रवक्ते म्हणाले की, वाघा येथे लंगर टाकल्यानंतर, तीन दिवसीय उत्सव साजरा करण्यासाठी भाविकांना पंजा साहिब गुरुद्वारामध्ये नेण्यात आले. बैसाखी हा शीख आणि हिंदूंचा सण आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि इतर सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
बैसाखी का साजरा केला जातो?
शीख पंथांचे दहावे गुरु गुरु गोबिंद सिंह यांनी १३ एप्रिल १६९९ साली खालसा पंथाची स्थापना केली होती. या दिवसापासून बैसाखी सणाची सुरुवात झाली. शीख लोकं धर्माची स्थापना म्हणून आणि कापणीचा दिवस म्हणून साजरा करतात. या महिन्यात रब्बी पिकाच्या काढणीला सुरुवात होते. त्यामुळे शेतकरी आपल्या आनंदाचा सण म्हणून साजरा करतात.
बैसाखीचे महत्त्व
शीख धर्मा व्यतिरिक्त हिंदू धर्मातही बैसाखी सण अधिक महत्त्वाचा असतो. या दिवशी स्नान-दान आणि पूजा अर्चा केली जाते. असे म्हटले जाते की, ‘मुनी भागीरथने गंगा देवीला पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि आजच्या दिवशी त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली होती. त्यामुळे या दिवशी गंगेत स्नान करून गंगेची पूजा केल्याने फळ प्राप्ती मिळते.’ याशिवाय आज सूर्य मेष राशीत प्रवेश करत असल्याने याला मेष संक्रांती म्हटले जाते. प्रत्येक राशीच्या लोकांवर याचा प्रभाव पडतो.
हेही वाचा – vastu tips- राशीनुसार निवडा पर्सचा रंग, पैशांची कधीच नसेल कमतरता